ना रांगा, ना Waiting... विधानसभेला होणार सुपरफास्ट व्होटींग! निवडणूक आयोगाकडून विशेष आदेश

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत मतदानादरम्यान मुंबईतसहीत अनेक शहारांमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहयला मिळाल्या. यामधूनच आता निवडणूक आयोगाने धडा घेऊन नवीन धोरणं अवलंबलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 20, 2024, 09:47 AM IST
ना रांगा, ना Waiting... विधानसभेला होणार सुपरफास्ट व्होटींग! निवडणूक आयोगाकडून विशेष आदेश title=
विधानसभेला वेगाने मतदान होण्यासाठी विशेष सूचना

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. एकाच मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने हा गोंधळ झाल्याने आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला असून तशापद्धतीच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला केल्या आहेत. राजकीय पक्षांनी मुंबईमध्ये लोकसभा मतदानाच्या वेळेस झालेल्या सावळ्या गोंधळानंतर मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. याच मागणीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावर 1500 मतदारच असावेत अशी सूचना राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे विधानसभेला मुंबईबरोबरच राज्यातील नागरिकांना गोंधळविरहित मतदान करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पार पडली विशेष बैठक

सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या निर्देशांप्रमाणे राज्यातील मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण केलं जात आहे. याच अंतर्गत मतदान केंद्राचं अधिक उत्तम पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी आणि मतदारांचं योग्य पद्धथीने अलॉटमेंट होण्यासाठी विशेष कॉर्निडनेशनवर भर दिला जातोय. निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांबद्दलची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. तसेच राजकीय पक्षांनी केलेल्या सूचना लक्षात घेत मतदार केंद्रांवरील कॉर्डिनेशन अधिक सुरळीत व्हावे आणि मतदानाच्या दिवशी गोंधळ होऊ नये यासंदर्भातील वेगवेगळ्या सूचना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच देण्यात आल्या.

मतदान केंद्रांची विभागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्ल्याप्रमाणे एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1500 मतदान ठेवण्याच्या सूचनेचा संदर्भ देत अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांची विभागणी करुन नवीन मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना मतदानासाठी अधिक वेळ वाट पाहवी लागणार नाही आणि प्रक्रिया जलदगतीने पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नव्या सूचनांमुळे प्रत्येक केंद्रावर विधानसभेला सुपरफास्ट मतदान शक्य होईल असंही म्हटलं जात आहे.

नव्या सूचना काय?

मतदार केंद्रांची विभागणी झाली तरी नवीन मतदार केंद्र हे मूळ मतदार केंद्राच्या इमारतीतच असणं आवश्यक आहे. 

ज्या इमारतीमध्ये एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असतील आणि अशा केंद्रावर मतदारांची संख्या अधिक असमान असेल तर वाढीव मतदारांना अन्य केंद्रावर स्थलांतरीत करण्यासंदर्भातील तरतूद तयार ठेवावी. या माध्यमातून ऐनवेळी एकाच केंद्रावर होणारी गर्दी टाळता येईल.

वाढीव मतदारांना त्याच इमारतीमधील अन्य मतदान केंद्रांवर स्थलांतरीत करुन मतदान प्रक्रियेचा वेग कायम राखता येईल. यासंदर्भातील तयारी केंद्रावर असणं अपेक्षित आहे.

वाढीव मतदारांना दुसऱ्या इमारतीमधील मतदान केंद्रावर पाठवू नयेत. हे स्थलांतर करताना एखादी वस्ती, परिसर किंवा अगदी कुटुंबही एकत्र एकाच ठिकाणी मतदान केंद्रावर राहील याची विशेष काळजी घेण्याची आदेश देण्यात आलेत.

मतदान केंद्राचं विभाजन आणि वाढीव मतदारांचं वाटप करताना भौगोलिक एकसंघता अबाधित राहील असं पाहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.