विधानपरिषद निकालामागे अदृश्य हात? अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले 'आम्हाला ज्यांनी...'

Maharashtra Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून महायुतीला मोठं यश मिळालं आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 12, 2024, 07:32 PM IST
विधानपरिषद निकालामागे अदृश्य हात? अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले 'आम्हाला ज्यांनी...' title=

Maharashtra Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून महायुतीला मोठं यश मिळालं आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे यांना पहिल्या पसंतीची 24 आणि राजेश विटेकर यांना 23 मतं मिळाली. निकाल येत असताना अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच निकालामागे अदृश्य हात नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विधान परिषदेसाठी नेमकी रणनीती कशी आखली याचाही खुलासा केला. 

"माझ्या सहकाऱ्यांनी पुढचे काही राऊंड झाले तरी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं सांगितलं आहे. एकंदरीत या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. वेगवेगळ्या बातम्या यावेळी पसरवल्या जात होत्या. आमच्याकडे 42 मतंच होती, पण त्यापेक्षा अधिक मतं आमदारांनी शिवाजीराव आणि राजेश विटेकरांना दिली त्याबद्दल मी आमदारांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत ते विधीमंडळात योग्य काम करतील. पक्षाची, जनतेची भूमिका मांडून प्रश्न सोडवतील," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. 

निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीबद्दल ते म्हणाले की, "आमदार फुटणार अशा बातम्या येत होत्या. पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाने आपली मंत सांभाळायची यावर चर्चा केली. तसंच बाकीचे आमदार त्यांना सगळ्यांनीच आपल्याकडे खेचण्याचा किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही असं ठरलं होतं. वेगवेगळ्या पक्षांनी जबाबदारी वाटून घेतली होती. आम्हाला मतं कमी होती. स्वत: एकनाथ शिंदे यांनाही कमी होती. पण अपक्ष, छोटे पक्ष असतात". तीन वेळा मी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. एकदा वर्षावर बैठक झाली. आम्ही एकत्र मिळून नाही तर प्रत्यकेजण वेगळी विनंती करेल असं ठरलं होतं असं पुन्हा त्यांनी सांगितलं. महायुतीला विधानसभेतही असंच यश मिळावं यासाठी प्रयत्न असेल असा विश्वासही व्यक्त केला. 

आमची महायुतीची एकता महाराष्ट्राला पाहायला मिळाली आहे. यापुढेही विधानसभा निवडणुकीत एकी दाखवत राज्यात महायुतीचं सरकार निवडून आणता येईल यासाठी परीश्रम करु. ज्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे त्या सगळ्याचे मी आभार मानतो. निवडून आलेल्यांचं कौतुक, अभिनंदन करतो," असं ते म्हणाले. 

पुढे त्यांनी सांगितलं की, "आम्हाला ही निवडणूक बिनविरोधी होईल असं वाटत होतं. पण अचानक एक अतिरिक्त उमेदवार आला आणि निवडणुकीला वेगळ्या प्रकारची रंगत आली. पण आता चित्र स्पष्ट झालं आहे. मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेत निवडून गेले आहेत. तिथे आता महायुतीला बहुमत मिळालं आहे. यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आमदारांनी ऐकल्या. कुटुंब म्हणून सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न होता. लोकशाही पद्धतीने निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात यश मिळालं याचं समाधान आहे".

निकालामागे अदृश्य शक्ती होती का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "अदृश्य शक्ती वैगेरे असं काही नसतं. प्रयत्न करायचे असतात. तुम्हाला आमदारांशी संबंध चांगले ठेवावे लागतात. त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आमच्या सहकारी मित्रांनी चांगलं काम केलं. आम्हाला ज्यांन शब्द दिला त्यांनी मतदान केलं हे निकालावरुन दिसत आहे".