सांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे. 

Updated: Mar 7, 2023, 03:50 PM IST
सांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यातील शेतकऱ्याच्या (Farmers) डोळ्यात पाणी आणलंय. हातचं पीक गेल्याने सांगा जगायचं कसं असा प्रश्न विचारायची वेळी बळीराजावर आलीय. त्यातच राज्यातील काही भागात गारपीट झाली आणि उरलं सुरलेलं पीकही मातीमोल झालं. धुळे जिल्ह्यातील (Dhule) टिटाने आणि खोरी परिसराला गारपिटीने झोडपून काढलं. कर्ज कसे फेडायचं? संसार कसा चालवायचा? असे प्रश्न आता शेतकऱ्यांना सतवतायेत. शासनाने पंचनामांच्या पलीकडे जाऊन मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. 

शेतकऱ्यांची केविलवाणी कैफियत
साक्रीतल्या टिटाने गावातील प्रकाश पाटील यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रामध्ये गहू, कांदा, बाजरी आणि हरभऱ्याची लागवड केली होती. यातली बाजरी सोडली तर अन्य सर्व पीक ही काढणीला आलेली. हातातोंडांशी आलेला हंगाम. पीक उमदे असल्याने दोन पैसे हाती शिल्लक राहतील अशी त्यांनी अपेक्षा बाळगली होती. मात्र अवघ्या 24 तासांतच त्यांच्या अपेक्षांना सुरुंग लागला. गारपीटीच्या संकटने होत्याचं नव्हतं केले. गहू भुईसपाट झाला, कांदा छिनविच्छिन झाला, हरभरा मातीमोल झाला, अवघ्या काही तास झालेल्या विक्रमी गरपीटीने रंजक स्वप्न उद्धवस्त केलं. गारपिटीमुळे प्रकाश पाटील यांच्या संपूर्ण क्षेत्राच नुकसान झालं. हाती काहीही लागणार नाही.. कर्ज कसं फेडावं? हा प्रश्न, घर कसं चालवावं? मुलांचे शिक्षण? आणि त्यात आजारपण आलं तर? असे अनेक प्रश्न प्रकाश पाटील यांच्या मनात काहूर माजवतायत.

कांदा पिकाला फटका
जी गत प्रकाश पाटील यांची तीच हरीश बागुल यांची. हरीश यांनी पाच एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली. अवघ्या काही दिवसांमध्ये कांदा काढला जाणार आणि तो बाजारात विकून कर्ज फेडणार. या विचारात हरिश होते. मात्र अचानक गारपीटीने त्यांच्या कांदा पिकाला झोडपून काढल. कांदा मातीमोल झाला. भिजलेला कांदा काढावा की शेतातच सडू द्यावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही रुपयांचं देखील उत्पन्न त्यांना मिळणार नाही. त्याच्यामुळे हरीश हताश झाले आहेत. 

प्रकाश पाटील. हरीश बागुल असे अनेक शेतकरी आहेत, जे गारपिटीमुळे उध्वस्त झाले आहेत. गारपिटे मुळे उध्वस्त झालेली पिकं मन सुन्न करीत आहेत. पंचांनाम्याचे सोस्कर उरकले जातं आहेत. मात्र प्रत्येक्षात संपूर्ण नुकसान भरपाई केव्हा मिळेल हा प्रश्न अनुत्तारित आहे.