Maharashtra Bhushan Award : 'तुम्ही जेवून घ्या, कार्यक्रम संपल्यावर येते...' पण ती माऊली घरी परतलीच नाही

नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 श्रीसदस्यांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याभरातील लाखो श्रीसदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.

Updated: Apr 17, 2023, 05:11 PM IST
Maharashtra Bhushan Award : 'तुम्ही जेवून घ्या, कार्यक्रम संपल्यावर येते...' पण ती माऊली घरी परतलीच नाही title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र्र भूषण कार्यक्रमात (Maharashtra Bhushan Award) 13 जणांचा मृत्यू (13 Death) झाला. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून श्रीसदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. भर उन्हात लाखोंची गर्दी जमली होती. पण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना उन्हाचा त्रास झाला. दुर्देवी उष्माघाताने (Heatstroke) 13 जणांचा मृत्यू झाला. काही जण रात्रीपासूनच तर काही जणं पहाटेपासून या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत (Navi Mumbai) जमले होते. 

मीनाक्षी मेस्त्रीही पहाटेच पोहोचल्या
वसईमधील 58 वर्षांच्या मीनाक्षी मिस्त्री यादेखील पहाटेच उठून कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या होत्या. पहाटे पाच वाजता उठून त्यांनी सर्वांसाठी जेवण बनवलं. घरातील सर्व झोपले असताना तीने कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर घरी फोन केला. जेवण तयार केलं आहे, तुम्ही सर्वजण जेवण घ्या, कार्यक्रम संपल्यावर घरी येते असा निरोप त्यांनी दिला. पण मिनाक्षी मिस्त्री यांचे तेच शब्द अखेरचे ठरले. कार्यक्रम संपल्यावर येते असं म्हणणाऱ्या मिनाक्षी घरी परतल्याच नाहीत. 

मीनाक्षी मिस्त्री या अंगणवाडी सेविका म्हणून काम करायच्या. दुपारी पुरस्कार सोहळा पार पडला. पण रात्री उशीरापर्यंत मीनाक्षी मिस्त्री घरी परतल्या नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यांचा फोनही लागत नसल्याचं घरचे घाबरले. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं, रात्री उशीरा त्यांना मीनाक्षी मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

मृत्यू उष्माघाताने नाही तर?
पण आपल्या बहिणीचा मृत्यू उष्माघाताने  झाला नसल्याचा नसून चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा दावा मीनाक्षी मिस्त्री यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मीनाक्षी यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असल्याने नक्की तिकडे  काय झाले आहे हे कळायला मार्ग नाही , प्रशासनाने व्यवस्था नीट केली नसल्याने हे घडल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.

खारघरमधल्या गुलाब पाटील यांचाही मृत्यू
खारघर दुर्घटनेतील बळी पडलेल्या गुलाब पाटील या विरार गावातील रहिवासी. गावातील आणि कुटुंबातील लोक आप्पासाहेब धर्माधिकारींच्या बैठकीला हजेरी लावणारे. अप्पासाहेबांना पुरस्कार मिळणार म्हणून वसई मधून पाच बस शनिवारी रात्री निघाल्या गुलाब पाटील देखील यात होत्या. रात्रीच त्या खारघर मधील मैदानात येऊन बसल्या.  इतर महिला देखील सोबत असल्याने गुलाब पाटील यांचं कुटुंब निश्चिंत होतं. पण त्या घरी आल्या नाहीत त्याचा फोन आणि पर्स खाली पडलेली आढळली. त्यांना कामोठ्यातल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.