शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद

शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी करणार ‘ई पीक पाहणी’ करु शकणार आहे.  

Updated: Jul 11, 2020, 08:35 AM IST
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद title=
प्रतिकात्मक छाया

मुंबई / अमरावती : शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी करणार ‘ई पीक पाहणी’ करु शकणार आहे. त्यामुळे पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होईल, असा विश्वास अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या ७/१२ वर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते. सद्य:स्थितीत गाव नमुना १२ वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते. आता शेतकरीच आपल्या पिकाची नोंद करु शकणार आहेत.

शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 'ई पीक पाहणी' हे मोबाईलवरील ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सात बारावर करु शकणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद

विध विभागांकडून अनेक योजना व कामांमध्ये अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार शासनाने पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

तलाठ्यांकडे जावे लागणार नाही!

तलाठ्यांकडील वाढत जाणारा कामाचा बोजा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक एखादे महत्त्वाचे काम करावे लागणे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदी घेणे यामध्ये विलंब लागू शकतो. त्यामुळे पीक नोंदीच्या आधारावर जी कामे शेतकऱ्यांना करावयाची असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली.

ई पीक पाहणी मोबाईल ॲप

यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले असून ते सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वर प्ले स्टोअरमधून सहज घेता येणे शक्य आहे. या ॲपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. 

या ॲपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकणार आहेत, शिवाय पिकाचा फोटो काढून तो ॲपवर अपलोड करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी यांच्या लॉग इन वर उपलब्ध होणार आहे, त्याला तलाठी यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या ७/१२ वर तात्काळ होणार आहे, अशी माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

ई पीक पाहणी ॲपवरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद केल्यास अचूक व गतीने माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे. या माहितीचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पीक कर्ज, पीक विमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणे यामध्ये होणार आहे.

१५ जुलैपासून खरीप हंगाम

मागील वर्षीच्या खरीप हंगामात अचलपूर तालुक्यातील २३८०८ शेतकऱ्यांनी या ॲपच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे. येत्या १५ जुलैपासून खरीप हंगामातील पीक पाहणीला सुरुवात होणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी ही फक्त या मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वतः करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ही नोंदणी ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा करता येणार आहे, असेही ते म्हणाले. 

शेतकऱ्यांना प्रशिक्षण 

शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गावात तलाठी व कृषी सहायक, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक दोन मंडळाला एक पालक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.