'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

Loksabha Election: 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच धक्कादायक विधान केले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 18, 2024, 01:52 PM IST
'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ title=

Chandrkant Patil On Devendra Fadanvis: भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षण अटक झाली असती, असं विधान त्यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहराच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे बोलत होते. यावेळी त्यांनी माढा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकांबाबत मत व्यक्त करत होते. त्यावेळी भाषणात त्यांना महाविकास आघाडीवरही सूचक निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षण अटक होऊ शकली असती, असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केले आहे. हे आम्हाला माहित आहे. कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांना अटक झाली असती. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले. कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेच्या काळात अशी वेळ आली होती असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केल आहे

दरम्यान, माढा आणि सोलापूर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई होणार आहे. यावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. सोलापूरची निवडणूक कठीण नाही. माढ्याची निवडणूकदेखील कठिण नाहीये ती कठिण करण्यात आली आहे. ईश्वराला सगळ्यांची काळजी आहे. तो त्याचे संतुलन बरोबर करत असतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने महायुतीसमोर मजबूत आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे मतदार संघातील आज जास्तीत जास्त आमदार महायुतीच्या बाजूने असतानाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक कठीण असल्याची चक्क कबुली दिली आहे. सोलापूर मतदारसंघातील निवडणूक ही इतकी कठीण नाही. त्यापेक्षा माढा लोकसभा मतदारसंघातली निवडणूक कठीण झालेली आहे त्यामुळे प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच भाजप बॅक फुटवर गेलेला आहे असं त्यांच्या वक्तव्यातून जाणवू लागलेला आहे. त्यामुळं भाजपच्या गोटात गंभीर वातावरण आहे.