Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Aug 28, 2023, 06:57 PM IST
Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा! title=
Jitendra Awhad, Telgi Scam, Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal vs Jitendra Awhad : 'अब्दुल करीम तेलगी' हे नाव सर्वांनाच माहित असेल. लोकांची फसवणूक करून ज्याने मोठं साम्राज्य उभं केलं, हाच तो अब्दुल करीम तेलगी... संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर 'स्कॅम 2003' (Scam 2003) नावाची नवी वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या तेलगी स्कॅमविषयी (Telgi Scam) चर्चा होताना दिसत आहे. याच तेलगी प्रकरणावरून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

23 डिसेंबर 2003 रोजी  गृहमंत्रीपदाचा राजीनामा का घेतला होता? जे तेलगी प्रकरण होतं. त्याला मीच अटक केली होती. त्याच्यावर मोक्का देखील लावला होता. काही लोकांनी आरोप केले अन् राजीनामा द्यायला लावला. भुजबळांचा राजीनामा घेऊ नका असा फोन आला होता, पण राजीनामा घेतला गेला, असं भुजबळांनी म्हटलं होतं. गुगली टाकायची आणि स्वत:च्या खेळाडूला बाद करायचं, असं म्हणत भुजबळांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. सीबीआयने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी अॅडिशनल ऍडव्होकेट जनरल (Additional Advocate General) अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली. त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही शरद पवार साहेबांशी चर्चा करा. शरद पवार साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली, असं आव्हाड म्हणतात.

त्यानंतर दोन महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्यानंतर जी ओरिजनल चार्जशीट होती ज्यामध्ये ती नावं होती ती सगळी वगळण्यात आली होती. यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला.. तो अदृश्य हात कुणाचा? समझने वाले को इशारा काफी होता है, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

आणखी वाचा - 'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!

दरम्यान, तेलगी घोटाळा प्रकरण तेव्हा ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी उचलून धरलं होतं. त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने तपास करण्याचे आदेश दिले होते. विशेष तपास पथकाने एकूण 54 जणांना अटक केली होती. यामध्ये 2 तत्कालीन आमदारांचाही समावेश होता. महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावरून निवृत्त झालेले एस. एस. पुरी यांना प्रकरणाची चौकशी दिली होती.