मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 2, 2023, 10:02 AM IST
मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...' title=
राज ठाकरेंनी कठोर शब्दांत केली टीका

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी 'एक्स'वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. "जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो," असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारचं चुकलं हे निश्चित

"या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याच आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित," असं राज यांनी म्हटलं आहे. 

प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?

पुढे बोलताना राज ठाकरेंनी, "राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?" असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, "इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं," असंही राज यांनी म्हटलं आहे. 

मराठी मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत

"मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत," असं म्हणत राज ठाकरेंनी आधीच्या आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

सरकार पाडण्याची खुमखुमी मिटली 

"काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती,  ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे," असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की...

"माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत,  तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील," असा विश्वास राज ठाकरेंनी मराठा सामाजातील आंदोलकांना दिला आहे.