कोरोनाच्या RTPCR चाचणीसाठी नागरिक आता स्वत:च टेस्ट सॅम्पल घेऊ शकणार?

 कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी भारत पायाभूत औषध उपचार सुविधा आणि कोरोना चाचणीची क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलत आहे.

Updated: May 29, 2021, 08:30 PM IST
कोरोनाच्या RTPCR चाचणीसाठी नागरिक आता स्वत:च टेस्ट सॅम्पल घेऊ शकणार? title=

नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी भारत पायाभूत औषध उपचार सुविधा आणि कोरोना चाचणीची क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (एनईईआरआय) च्या शास्त्रज्ञांनी एक पर्याय शोधून काढला आहे. या पर्याय आहे 'मीठाच्या गुळण्या'. कोविड -19 च्या चाचणीसाठी मीठाच्या गुळण्या करण्याची, आरटी-पीसीआर पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.

वेगवान चाचणी पद्धत

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याच्या या पद्धतीमुळे अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. ही पद्धत सोपी, वेगवान, कमी खर्चिक, रुग्णाला अनुकूल आणि आरामदायक आहे. तसेच ती जलदगतीने परिणाम देखील करते. किमान पायाभूत सुविधांची आवश्यकता लक्षात घेता, ही पद्धत ग्रामीण आणि आदिवासी भागात रहाणाऱ्या लोकांसाठी योग्य आणि फायदेशीर आहे.

एनईईआरआयमधील पर्यावरण विषाणू विज्ञान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार म्हणाले, "स्वॅब संकलन पद्धतीसाठी वेळ लागतो. याव्यतिरिक्त, या पद्धतीमुळे संक्रमित झालेल्या रुग्णाला देखील तपासणी दरम्यान काही गैरसोय होऊ शकते." डॉ. कृष्णा खैरनार म्हणाले की, यामुळे रुग्णाला कधीकधी अस्वस्थ वाटू शकते. तसेच, या प्रक्रियेत संकलित केलेले नमुने संकलन केंद्र आणि चाचणी केंद्राकडे नेण्यास थोडा वेळ लागतो. तर दुसरीकडे, मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत त्वरित, आरामदायक आणि रुग्णास अनुकूल आहे. यामुळे नमुना त्वरित घेता येतो आणि तीन तासांत निकाल देखील मिळू शकतो.

डॉ. खैरनार यांच्या म्हणण्यानुसार, ही पद्धत इतकी सोपी आहे की, रुग्ण स्वतःच चाचणीसाठी नमुना गोळा करू शकतो. ते म्हणाले की, नाक आणि तोंडातून नासोफेरींजल आणि ऑरोफरीन्जियल स्वॅब गोळा करण्यासारख्या पद्धतींमध्ये तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे आणि त्यास वेळ लागतो. तर मीठाच्या पाण्याने गुळण्याकरुन केलेल्या आरटीपीसीअर पद्धतीमध्ये साध्या संकलनाच्या ट्यूबचा वापर केला जातो.

रुग्ण स्वत: चाचणी करू शकतो

रुग्ण मीठाच्या पाण्याने गुळण्या करून ते पाणी एका ट्यूबमध्ये जमा करु शकतो. त्यांनेतर या कलेक्शन ट्यूबला नमुना प्रयोगशाळेत नेले जाते. जेथे त्या ट्यूबला खोलीच्या तपमानावर एनईईआरआईने तयार केलेल्या विशेष बफर सोल्यूशन मध्ये ठेवले जाते. या सोल्यूशनला गरम केल्यावर, एक आरएनए टेम्पलेट तयार केला जातो. जे पुढील प्रक्रियेसाठी रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शनसाठी (आरटी-पीसीआर) पाठवले जाते.

डॉ. कृष्णा खैरनार म्हणाले की, याद्वारे लोकं त्यांची स्वत: ची चाचणी देखील घेऊ शकतात, ही पद्धत पर्यावरणास अनुकूल देखील आहे, कारण त्यात कमीतकमी कचरा उत्पादन होत आहे.

वैज्ञानिकांना नवीन आशा

वैज्ञानिकांना आशा आहे की, ही नवीन चाचणी पद्धत विशेषत: ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होईल. या पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता मिळाली आहे. तसेच, एनईईआरआयने सांगितले की, त्यांनी देशभरात या नवीन पद्धतीचा वापर करण्यासाठी इतर चाचणी प्रयोगशाळांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक गोष्टींची व्यवस्था ते करणार आहेत.

ही चाचणी पद्धत देशभर राबवली जाईल

ही प्रक्रिया पुढे नेण्याची परवानगी नागपूर महानगरपालिकेने दिली आहे. त्यानंतर एनईईआरआईमध्ये मंजूर झालेल्या चाचणी प्रोटोकॉलनुसार चाचणी सुरू झाली आहे.

डॉ. खैरनार आणि त्यांच्या कार्यसंघाने  आशा व्यक्त केली आहे की, ही पद्धत राष्ट्रीय स्तरावर राबविली जाईल, ज्यामुळे जलद आणि अधिकाधिक नागरिक अनुकूल चाचण्या होतील आणि कोरोनाविरूद्ध आपला लढा आणखी दृढ होईल.