एकेकाळचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलाय भाजपवर हा गंभीर आरोप

धुळ्याचे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत.  

Updated: Mar 3, 2022, 09:13 PM IST
एकेकाळचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलाय भाजपवर हा गंभीर आरोप title=

मुंबई : तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तेलगी घोटाळ्याचे आरोप करून करणारे विधानसभा सभागृहात खळबळ माजविणारे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आता गंभीर आरोप केलेत.

भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मुंबई येथील ईडी कार्यालय जाऊन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. आज तक्रार दिल्यानंतर मी 8 दिवस वाट पाहणार आहे. त्यानंतर मी दर मंगळवारी भाजपच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्यानंतर 2014-15 मुंबई बाॅम्ब ब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची याच्याशी संबंधित असलेल्या कंपनीच्या खात्यातून भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी देण्यात आली असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केलाय.

RKW Developers Pvt Ltd म्हणजेच पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून 10 कोटी रूपये भारतीय जनता पक्षाला देणगी म्हणून देण्यात आलीय. पण, ही देणगी आहे की खंडणी असा सवाल अनिल गोटे यांनी केला.

भारतीय जनता पक्षाला १० कोटींचा ही देणगी की खंडणी (?) दोन वेळा देण्यात आली. अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी जर मंत्री नवाब मलिक यांना अटक करू शकते तर तोच न्याय फडणवीस यांनाही लावण्यात यावा, अशी मागणी ईडीकडे केल्याचेही गोटे यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या आजच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर, त्यानंतर सभागृहात मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी लावून धरलीय. तर, सत्ताधारी मलिक यांच्या बाजूने उभे असून राजीनामा घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

विरोधी पक्ष भाजपकडून नवाब मलिक आणि त्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध हा मुद्दा उचलून धरणार आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आरोप म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या हात आयते मिळालेले कोलीत मान्यता येत आहे.