सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-यांचे धरणे आंदोलन

नागपूर-तुळजापूर महामार्ग आणि वर्धा-नांदेड रेल्वे राज्यमार्गासाठी जमीन संपादन करतांना शासनाकडून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

Updated: Dec 15, 2017, 06:37 PM IST
सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-यांचे धरणे आंदोलन title=

यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्ग आणि वर्धा-नांदेड रेल्वे राज्यमार्गासाठी जमीन संपादन करतांना शासनाकडून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

शेतक-यांना कमी मोबदला

शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृध्दी महामार्गाच्या तुलनेत अत्यंत कमी असा ३५ ते ४० रूपये चौरस मीटर महामार्गासाठी तर १५ ते २५ रूपये चौरस मिटर रेल्वेसाठी मोबदला जाहीर केला आहे. हा मोबदला अन्यायकारक असून या अन्यायाविरोधात कळंब शेतकरी संघर्ष समिती, कळंब तालुका विकास आघाडी, रेल्वे महामार्ग बाधीत शेतकरी समिती यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

किती दराची मागणी?

भू-संपादनाचा चौरस मिटरप्रमाणे ५५० ते ७०० रूपये प्रमाणे दर द्यावा, भू-संपादनात विहिर बाधीत झाल्यास सर्वच फळझाडांचा मोबदला द्यावा, नगर पंचायत क्षेत्रातील जमिनीचा दर ग्रामपंचायत क्षेत्रापेक्षा अधिक असावा, सर्व मोबदला एकरकमी स्वरूपात दिला जावा अश्या  मागण्या यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आल्या.