विधानपरिषद निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

या पक्षाकडून ऑफर असल्याचा दावा

Updated: May 12, 2020, 12:40 PM IST
विधानपरिषद निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट title=

वाल्मिक जोशी, जळगाव : विधानपरिषद निवडणुकीत तिकीट नाकालल्यानं नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे यांना सत्ताधारी पक्षाकडून ऑफर होती आणि भाजपमधील काही आमदार एकनाथ खडसे यांच्या पाठिशी होते, अशी चर्चा होती. यावर एकनाथ खडसे यांनी प्रथमच गौप्यस्फोट केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत तिकीट नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी तातडीने व्यक्त केली होती. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागेल अशी चर्चा असताना त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे खडसे यांनी आपली खदखद मीडियासमोर जाहीरपणे व्यक्त केली.

राज्यसभेला तिकीट मिळालं नाही तेव्हा आपली विधानपरिषदेवर वर्णी लावली जाईल, असे सांगण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी शिफारस केली गेली तेव्हाही आम्हा तिघांची नावे होती असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात पक्षाने ज्यांची शिफारस केली नव्हती, अशा गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपचडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आता राजकारण करणे योग्य नाही. पण कोरोनाचा विषय संपल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

काँग्रेसकडून ऑफर?

विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या सहा-सात आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावा खडसे यांनी केला.

आम्हाला तिकीट मिळाले नाही याचे दुःख नाही, पण ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षाविरोधात काम केले अशा पक्षाबाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देण्यात आले. त्याऐवजी माधव भंडारी, मिलिंद पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, केशव उपाध्ये यांच्यासारखे लोक वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत आहेत. कधीतरी विधानपरिषद आपल्याला मिळेल या आशेवर ते आहेत. पण निष्ठावंतांना डावलण्यात आले. हा अन्याय आहे, असे खडसे म्हणाले.