तुमच्या परवानगीने सभागृहात आलो नाही.. का संतापले आशिष शेलार?

कॉंग्रेस आमदार नाना पटोले आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या सभागृहातील उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना आशिष शेलार अचानक संतप्त झाले.  

Updated: Mar 10, 2022, 02:52 PM IST
तुमच्या परवानगीने सभागृहात आलो नाही.. का संतापले आशिष शेलार?  title=

मुंबई : काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन होऊनही ते सभागृहात उपस्थित कसे? विधिमंडळाच्या अधिकारावर न्यायालयाने हस्तक्षेप करता नये, असे मत मांडले.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी, सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अधिकारावर गड आणता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय फक्त या आमदारांपुरताच मर्यादित नाही. तर तो आता देशभरात लागू होईल. या निर्णयामुळे उच्च न्यायालय, सत्र न्यायालय हे ही या निर्णयाच्या आधारे निकाल देऊ शकतात. त्यामुळे असे निर्णय आता मान्य करणार का?

सरकार आणि विधिमंडळाने ही लढाई लढायला हवी होती. जे निर्णय सभागृहात घेतले आहे त्याचा फेरनिर्णय घेण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे. तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती सभागृहाला सांगणे गरजेचे होते. भाजपचे सदस्य आपले काही दुष्मन नाहीत. असे ते म्हणाले.

भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या या हरकतीचा मुद्द्याचे स्पष्टीकरण देताना आमदार आशिष शेलार म्हणाले, मी जे मत मांडत आहे. ते माझे मत नाही. सुप्रीम कोर्टाचे मत मांडत आहे.

याचवेळी नाना पटोले यांनी शेलार यांच्याकडे पाहून टिपण्णी केली. त्यावर शेलार संतप्त झाले. तुमच्या परवानगीने आम्ही येथे आलो नाही. कळलं का? तुमच्या परवानगीने आम्ही येथे आलो नाही, अशा शब्दात त्यांनी नाना पटोले यांना सुनावत आपलं पुढचं भाषण पूर्ण केलं.