कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद मिटेना, पुस्तकाच्या लेखकावरूनच वाद

लेखक रोहन माळवदकर की सौरभ विरकर? कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद मिटेना

Updated: Jan 21, 2022, 11:20 PM IST
 कोरेगाव भीमा पुस्तकाचा वाद मिटेना, पुस्तकाच्या लेखकावरूनच वाद title=

सागर आव्हाड, झी २४ तास, पुणे : कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव या पुस्तकावरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही आहे. आधी पुस्तकातील दाव्यांवर रिपब्लिकन संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आता या पुस्तकाचा लेखक नेमका कोण, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव या पुस्तकावरून रोज नव नवे वाद समोर येत आहेत. आता थेट या पुस्तकाच्या लेखनावरूनच वाद सुरू झालाय. आता या वादात भर पडलीय ती पुस्तक नेमकं कुणी लिहिलं, यावरून वाद सुरू झाला आहे. 

अॅड. रोहन माळवदकर यांनी नव्हे, तर उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीनं हे पुस्तक लिहिलंय, असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनं केला आहे. ही लढाई पेशव्यांविरोधात नव्हती, असा दावा करणारं नवं पुस्तक आलं आणि वाद सुरू झाला.

4 जानेवारी 2021 रोजी सौरभ विरकर यांनी एक लेख लिहिला होता. विरकर यांचा लेख आणि पुस्तकातील लिखाण संदर्भ तंतोतंत जुळत आहे. पुस्तक प्रकाशनाच्या वेळीही विरकर उपस्थित होते. विरकर हे सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण करतात.

माळवदकरांच्या नावानं पुस्तक खपवून दंगली घडवण्याचा विरकरांचा प्रयत्न होता का, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनं केली आहे. कोरेगाव भीमा पुस्तकावरून दररोज नवनवीन वाद समोर येत आहेत. मात्र कितीही वाद झाले तरी ते निकोप असायला हवेत. दोन समाजातील एकोपा कायम राहायला हवा.