कॉलेजं लवकरच सुरू होणार, राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंत यांची माहिती

उद्या कुलगुरुंसोबत बैठक झाल्यानंतर पुढचा निर्णय.

Updated: Jan 31, 2021, 07:10 PM IST
कॉलेजं लवकरच सुरू होणार, राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंत यांची माहिती title=

मुंबई : आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली. 'उद्या ऑनलाइन पदवी प्रदान सोहळा राज्यपाल यांच्या उपस्थितीत होणार आहे या बद्दल राज्यपाल यांची भेट घेतली. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांनी राज्यपालांना माहिती दिली. तसेच आता कॉलेजेस सुरू करण्याची वेळ आली आहे. त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

उद्या कुलगुरुंसोबत बैठक झाल्यानंतर प्रत्येक विद्यापीठाची कॉलेज सुरू करण्यासंदर्भात काय तयारी आहे याचा आढावा घेणार आहे. एक दोन दिवसात या गोष्टी स्पष्ट होतील. उद्या होणाऱ्या चर्चेची माहिती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना देणार आहे. कॉलेज लवकरच सुरू होतील पण विद्यार्थी आणि कर्मचारी यांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लोकलच्या वेळे विषयी आम्ही मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचं देखील सामंत यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल आणि महाविकासआघाडी मध्ये कटुता नाही. भविष्यात राज्यपाल महाविकास आघाडीला अपेक्षित निर्णय घेतील. १२ आमदारांच्या बद्दलचा विषय काढण्या एवढा मी मोठा नाही, पण लोकशाहीला मानणारे महाविकास आघाडीचा सन्मान करणारे राज्यपाल आहेत ते लवकरच आमच्या मनातील निर्णय घेतील. असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बालिश आहेत. त्यांना इतिहास माहीत नाही. महाराष्ट्रातील लोकं यामुळे संतप्त आहेत. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट केले पाहिजे. असं देखील उदय सांमत यांनी म्हटलं आहे.