दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला

Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

Updated: Nov 24, 2023, 08:34 AM IST
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला title=

Board Exam : शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन टप्प्यातील महत्त्वाच्या अशा बोर्डाच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत हा बदल केला जाणार आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होणार आहे. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांप्रमाणे सहामायी आणि वार्षिक पद्धतीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी 2024-25 किंवा 2025-26च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा एक टप्पा आहे. त्यामुळे या परीक्षांची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी चिंता असते. अनेकदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. तर कधी कधी शिक्षण अर्ध्यावर सोडून देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची गरज असते.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर 10 मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागवली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर लोकांची मते काय आहेत हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन वर्षात ही नवीन पद्धत लागू केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबण्याची शक्यता आहे. यासोबत एका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याची संधी असणार आहे. यासोबतच नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांमधील मजकूर देखील कमी करून तो मनोरंजक आणि समर्पक बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका माध्यम समूहाशी बोलताना सांगितले.

मात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच शिकवतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीने होणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र दिवाळीपूर्वी तर पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.