'शेतकरी नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत'

चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना टोला   

Updated: Jul 17, 2020, 06:16 PM IST
'शेतकरी नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली आहे. राज्यातील दूध दराचा मुद्दा अधोरेखित करत त्याच धर्तीवर राजू शेट्टी यांच्याकडून मात्र कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर तोफ डागली. 

सध्या राज्यात दुधाला २२ रुपये इतरा दर मिळत आहे. पण, या रकमेतून मूलभूत खर्चाची जुळवाजुळव करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका  दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नाही, असं म्हणत पाटील यांनी शेट्टींवर तोफ डागली. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम ही स्वीकारार्ह नसून त्यासाठी  शेट्टी यांची भूमिका महत्त्वाची आहे असं असतानाही त्यात होणारी दिरंगाई पाटील यांना खटकली. सोबतच राज्यात असणआरा युरियाचा तुटवडाही शेतकऱ्यांपुढची मोठी समस्या असल्याची बाब त्यांनी शेट्टींना बोचऱ्या स्वरात लक्षात आणून दिली. 

 

शेट्टी यांना मिळणाऱ्या आमदारकीचा उल्लेख करत त्या धर्तीवर आता थेट आमदार झाल्यानंरच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल असं वाटत आहे, हा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना लगावला.