पंकजा मुंडेंच्या नाराजीवर विनोद तावडे म्हणतात...

पंकजा मुंडे नाराज नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. 

Updated: Dec 2, 2019, 03:23 PM IST
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर विनोद तावडे म्हणतात... title=

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून 'भाजप' हटवले आहे. तसेच फेसबुक पोस्ट लिहत आपल्या समर्थकांना भावनिक साथ दिली आहे. त्यामुळे परळीध्ये १२ डिसेंबरला राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. या पराभवाला भाजपतील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. पण आता भाजप नेत्यांकडून याबद्दल सारवासारव करण्यास सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे नाराज नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. 

पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या भाजपा सोडणार नाही असे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचा दाव्यात काही तथ्य नाही असेही तावडे म्हणाले. आमचे कोणतेही नेते शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत कोणतही पद पंकजा मुंडे यांनी मागितले नसल्याचेही यावेळी तावडे म्हणाले. 

परळी मतदार संघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. याकरता आपण आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाही, असं पंकजा मुंडे त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या.

१२ डिसेंबर रोजी भाजप दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या दिवशी आपण मनसोक्त बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय? १२ डिसेंबरला पंकजा मुंडे वेगळा निर्णय सगळ्यांसमोर मांडणार आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

परळी मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडून पराभव झाला. त्यावेळी पंकजा मुंडेंनी 'लोकांनी माझा स्वीकार केला नाही' यावर भर देत आपला पराभव स्वीकारला. मी हा पराभव स्वीकारते, पुढे या पराभवाची समीक्षा आपण करु असे म्हणत मताधिक्य मिळालेल्यांनाही विजय अनाकलनीय आहे ही बाब पंकजा यांनी अधोरेखित केली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या मात्र या सगळ्यात पंकजा मुंडे कुठेच नव्हत्या. अखेर फेसबुक पोस्ट लिहून पंकजा मुंडे यांनी आपण काही काळाकरता अलिप्त राहणार असल्याचे म्हटलं आहे.