कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक

मराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली  आहे.

वनिता कांबळे | Updated: Jun 24, 2024, 08:58 PM IST
कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक    title=

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीस नेत्यांमध्ये आता निकराचा संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय... भुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत, मराठ्यांनो तयार राहा असं म्हणत जरांगे पाटलांनी आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय.. तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी मुस्लीम आरक्षणालाही हात घातला घातला आहे. 

मराठा - ओबीसी आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय.. नेत्यांच्या तोंडी आता निर्वाणीची भाषा पाहायला मिळतेय.. छगन भुजबळ यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मराठ्यांनाही तयार राहण्याचं आवाहन केलंय... जशास तसं उत्तर देऊ असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय. 

मनोज जरांगेवर भुजबळांचा पलटवार

ओबीसींनी राज्यात कधी दंगल घडवलीय का..? असा उलट सवाल विचारत जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केलीय. दुसरीकडे मराठा आंदोलनासोबतच मनोज जरांगे यांनी मुस्लीम आरक्षणालाही हात घातलाय. कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केलीय. तर  मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे... मुस्लिमांना खूश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं म्हणत  भुजबळांनी जरांगेंचा समाचार घेतलाय.. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी उत्तर दिले. मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. मुस्लिमांना खूश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं भुजबळ म्हणालेयत...मुस्लीम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्यायत. त्यामुळे मुस्लीम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली...त्यावर भुजबळांनी पलटवार केलाय.

जरांगे पाटलांनी अचानक मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्याला का हात घातला याची चर्चा सुरू झालीय.. मराठा आंदोलनाच्या लढ्यात जरांगे पाटील एकटे पडल्याचं बोललं जातंय. जरांगे पाटील यांनीही आपण एकटं पडल्याचं बोलून दाखवलंय. त्यामुळे त्यांना या लढ्यात मुस्लीम समाजाच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय. 

मराठा आणि ओबीसी नेत्यांनी आता निर्वाणीची भाषा सुरू केलीय. आपल्या या इशाऱ्यांमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडण्याची भीती आहे. राज्यातील जातीय घडी विस्कटायला एका दिवसाचाही वेळ लागणार नाही.. मात्र ही घडी बसायला अनेक वर्ष खर्ची पडतात.. याचा विचार दोन्हीबाजुंनी व्हायला हवा..