कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे दाखल - गृहमंत्री

विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ८५ लाख ५० हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Updated: Apr 28, 2020, 06:53 PM IST
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे दाखल - गृहमंत्री title=

मुंबई : राज्यात लाँकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ८१ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५९ घटना घडल्या असून या प्रकरणात ५३५ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ८१,०६३  गुन्हे नोंद झाले असून १६,५४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ८५ लाख ५० हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यांमध्ये २४ तास कार्यरत असतो. लाँकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर ७९,९०१ फोन आले. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण १,५५,०७६ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती आज गृहमंत्र्यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या ११०७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ४९,११३ वाहने जप्त करण्यात आली तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. १४ पोलीस अधिकारी व ८५ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच मुंबईत दोन हॉस्पिटल पोलिसांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले.

राज्यात एकूण ४७८५ हजार रिलिफ कँम्प आहेत. जवळपास ४,९७,२५६  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊन च्या काळातील सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.