मुलं सतत उलटं उत्तरं देतात? वापरा 'या' ट्रिक्स; ओरडण्याची आणि चिडण्याची गरजच भासणार नाही

काही मुलांमध्ये सतत उलटं उत्तर देण्याची सवय असते. मग ते पालक असो किंवा मित्र. अशावेळी पालकांना काय करावं कळत नाही? या सोप्या ट्रिक्सचा वापर करा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 5, 2024, 07:56 PM IST
मुलं सतत उलटं उत्तरं देतात? वापरा 'या' ट्रिक्स; ओरडण्याची आणि चिडण्याची गरजच भासणार नाही title=

मुलांचे संगोपन करणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते. कारण मुलं कोणत्या गोष्टींचं अनुकरण करतील हे सांगणे कठीण होते. अशावेळी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मुलांशी संवाद साधून कायम त्यांच्या मनात काय सुरु आहे हे समजून घेणे तितकेच गरजेचे असते. नाहीतर मुलं चुकीचं वागतात. अनेक मुलं सतत उलट उत्तर देतात. पालक अशावेळी काय करावे या प्रश्नाने हैराण होतात. मुलं लहान असतात. अशा मुलांना ओरडणं, मारणं देखील चुकीचं ठरतं. पण त्यांची ही सवय वेळीच सुधारणे गरजेचे असते. अशावेळी पालकांनी काही टिप्स फॉलो करणे गरजेचे असते. यामुळे मुलांना मारण्याची किंवा ओरडण्याची गरज भासत नाही. 

मुलांशी बोलताना काळजी घ्या 

मुले आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करून शिकतात. खास करुन पालकांकडून शिकत असतात. पालक मुलांशी कसे बोलतात. पालकांचं एकमेकांशी वागणं कसं आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कारण मुलं याच सगळ्यागोष्टी आत्मसात करतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांशी विचारपूर्वक आणि आदरपूर्वक बोलणे महत्त्वाचे आहे. तसेच आपापसात देखील बोलताना या गोष्टींचा विचार करावा, कारण पालकांच्या बोलण्याचा मुलांवर परिणाम होतो. 

मर्यादा महत्त्वाची 

मुलांसाठी मर्यादा निश्चित केल्या पाहिजेत. मुलांना कुठे आणि किती बोलावे हे सांगण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली आहे. जेव्हा मूलं काही चुकीचे बोलते किंवा चुकीच्या पद्धतीने उत्तर देते तेव्हा त्याला थांबवणे महत्त्वाचे असते. बोलण्यासोबतच मुलांच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवणे गरडेचे असते. उदाहरणार्थ, एखादे मूल बोलत असताना पळून गेले तर पालक स्पष्टपणे संवाद साधू शकतात की असे वर्तन चुकीचे आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मर्यादा लावून देणे महत्त्वाचे आहे. 

मुलांशी आदराने वागा 

मुलांशी आदर आणि प्रेमाने वागणे हे पालकांचे कर्तव्य आहे. कारण लहान मुलांचा इगो सर्वात महत्त्वाचा असतो. पालकांनी मुलांचे विचार आणि भावना ऐकणे महत्त्वाचे असते. जरी मुलांचं वागणं पालकांच्या मतांपेक्षा वेगळं असलं तरीही त्याच्याशी आदराने वागणे महत्त्वाचे आहे.  यामुळे नातेसंबंधात विश्वास आणि आदर निर्माण करतात. त्याचा परिणाम मुलांच्या वागण्यातही दिसून येतो आणि ते सूड घेण्याच्या सवयीपासून दूर राहतात.

मुलांवर सतत लक्ष ठेवणे

मुलांवर त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव पडतो. मुलांना कॉपी करण्याची सवय असते. अशा स्थितीत मुलं टीव्हीवर काय बघत आहेत यावर बारीक लक्ष ठेवा. जर ते मोबाईल-टीव्हीवर असे काही पाहत असतील जे त्यांच्या उलट बोलण्याच्या स्वभावाला आणखी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे.