408 तास आणि 41 कामगार! बोगद्यात 17 दिवस कसे काढले? पहिल्यांदा समोर आली माहिती

Uttarakhand Tunnel Rescue: उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकून आता 400 तासांहून जास्त कालावधी लोटला आहे. कुटुंबापासून काही मीटर अंतरावर असलेल्या या कामगारांनी बोगद्यात 17 दिवस कसे काढले याची माहिती समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 28, 2023, 07:16 PM IST
408 तास आणि 41 कामगार! बोगद्यात 17 दिवस कसे काढले? पहिल्यांदा समोर आली माहिती title=

Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. गेले 17 दिवस आणि 400 हून अधिक तास हे कामगार बोगद्यात अडकून पडले आहेत. आपल्या कुटुंबापासून हे कामगार आता काही मीटर अंतरावर आहेत. अशात देशभरातील लोकांच्या मनात सवाल निर्माण झालाय तो म्हणजे गेले सतरा दिवस या कामगारांनी बोगद्यात काय केलं, कसे दिवस काढले. जगण्यासाठी या कामगारांनी कसा संघर्ष केला. याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. 

जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती
बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता. एकमेकांचे चेहरेही नीटसे दिसत नव्हते. होता तो पक्त काळोख आणि काळोख. 12 नोव्हेंबरला सिलक्यारा बोगद्याचा एका बाजूचा भाग कोसळला आणि बोगदा बंद झाला. आणि इथूनच सुरु झाला 41 कामगारांचा जगण्याच संघर्ष. परिस्थिती इतकी बिकट होती की इथून लवकरच बाहेर पडता येणार नाही याची जाणीव अडकलेल्या कामगारांनाही (Workers) झाली होती. पण त्यांनी हार मानली नाही. येणार प्रत्येक दिवस लढण्यासाठी ते सज्ज झाले.  प्रबळ इच्छाशक्ती आणि कुटुंबियांना भेटण्याची आस यामुळे त्यांनी मिट्ट अंधाऱ्या बोगद्यात तब्बल 400 हून अधिक तास लढा दिला. 

मनोरंजनाचा मार्ग शोधला
पाईपच्या सहाय्याने बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी औषध, पाणी, जेवण याच्याबरोबर मनोरंजानाची काही साधनं पाठवण्यात आली. यात पत्त्यांचाही समावेश होता. वेळ घालवण्यासाठी कामगार तीन पत्ते, रम्मी खेळून स्वत:ला व्यस्त ठेवत होते. शरीर तंदरुस्त ठेवण्यासठी त्यांनी योगाही सुरुव केला. बचाव यंत्रणनेच्या मदतीने त्यांचं कुटुंबियांशी बोलणं सुरु होतं. कोणाचं आई-वडिलांबरोबर, कोणाची पत्नीबरोबर, तर कोणाचं मुलांसोबत झालेलं बोलणं या कामगारांना जगण्याचं नव बळ देत होतं. सर्व कामगारांनी शारिरीक आणि मानसिक तंदरुस्तीसाठी एक दैनंदिन कार्यक्रम बनवला होता. 

सहा इंचाची पाईपलाईन
बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधण्यासाठी सहा इंचाचा पाईप बोगद्यात टाकण्यात आला होता. या पाईपच्या माध्यमातून बचाव यंत्रणांनी कामगारांना मोबाईल फोन आणि बोर्ड गेम उपलब्ध करुन दिले होते. काही कामगारांना खैनीची गरज होती, ते ही त्यांना पुरवण्यात आलं. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी डॉक्टर कामगारांच्या सतत संपर्कात होते. डॉक्टरांनीच कामगारांना योगा करण्याच सल्ला दिला. 

वेळेवर जेवण देण्याचे प्रयत्न
सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे कामगारांना बोगद्यात चांगलं जेवण पुरवणं. हे कामही सहा इंचाच्या पाईपच्या माध्यमातूनच करण्यात आलं. सतरा दिवस कागमारांसाठी केळी, सफरचंद, दालखिचडी आणि खाण्याचे इतर पदार्थ पाईपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्यासाठी बोगद्यातच नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध होता.