बकरी ईदच्या दिवशी समोर आलं अनोखं पशू-प्रेम, 250 बकऱ्यांचा कु्र्बानीपासून वाचवला जीव

बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा आहे. पण बागपत इथं पशू प्रेमी समाजाने तब्बल 250 बकऱ्यांना जीवदान दिलं आहे. बाजारभावापेक्षा जास्त किंमत त्यांनी त्यांनी कुर्बानीला आलेल्या बकऱ्या विकत घेतल्या.

राजीव कासले | Updated: Jun 29, 2023, 07:40 PM IST
बकरी ईदच्या दिवशी समोर आलं अनोखं पशू-प्रेम, 250 बकऱ्यांचा कु्र्बानीपासून वाचवला जीव title=

Trending News : संपूर्ण देशभरात आज बकरी ईद (Bakri Eid) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रमजान ईदच्या 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते.  बकरी ईदला  ईद-उल-अजहा असंही म्हणतात. या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा आहे. यामागे मोठा इतिहास आहे. कुर्बानी दिलेल्या बकऱ्याचे तीन भाग केले जातात. एक स्वत:साठी, एक नातेवाईकांसाठी तर एक गरिबांसाठी दिला जातो. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. 

पशू प्रेमाचं अनोकं उदाहरण
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बागपत इथं बकरी ईदच्या दिवशी  पशू-प्रेमाचं अनोखं उदाहरण समोर आलं आहे. इथल्या अमीगनर सराय परिसरात ईदच्या निमित्ताने कुर्बानी देण्यासाठी 250 बकरे विकत आणण्यात आले होते. पण जैन समाजाने या सर्व बकऱ्या विकत घेत त्यांना जीवदान दिलंय. या सर्व बकऱ्यांना जीव दया संस्थेच्या पशूपालन केंद्रात ठेवण्यात आलं. या बकऱ्यांना सांभाळण्यासाठी जैन समाजाने निधीही संस्थेला दिला आहे. 

अमीनगर सरायमध्ये जैन समाजाच्या जीव दया संस्थेने 2016 मध्ये पशूपालन केंद्राची उभारणी केली. या केंद्रात बकऱ्यांना चारा आणि औषोधपचार दिले जातात. जीव दया संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार अमीनगरमध्ये कुर्बानीसाटी 250 बकरे आणण्यात आले आहेत. या सर्व बकऱ्या जैन समाजाने अधिक किंमत मोजत विकत घेतल्या. या बकऱ्यांची किंमत जवळपास वीस लाख इतकी आहे. जीव दया संस्थेच्या या केंद्रात 450 बकऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. 

बकरी ईद साजरी केली जाते?
इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबरांमध्ये हजरत इब्राहिम यांच्यापासून कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाल्याचा इतिहास आहे. परमश्रेष्ठ अल्लाहने हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन मुलाचं बलिदान दे, अशी आज्ञा केली होती. सलग तीन दिवस त्यांना स्वप्नात आपला मुलगा इस्माइल यांना बळी देण्याविषयी ईशआज्ञा होत होती. अल्लाहच्या अज्ञापुढे ते आपला आनंद कुर्बान करण्यास तयार होते. इब्राहिम यांनी जड अंतःकरणाने डोळे बंद करुन मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला. मात्र, त्यांनी गळ्यावरून चाकू फिरवताच अचानक मुलगा इस्माईल यांच्याऐवजी एक बकरी प्रकट झाली. हजरत इब्राहिम यांनी डोळ्याची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्माईल सुरक्षित होता.अल्लाहने घेतलेली ही परीक्षा होती असा समज आहे. त्यानंतर पशू बलिदानाची ही परंपरा सुरु झाली.