मैत्री की वेडेपणा? कॅन्सरने मृत्यू झालेल्या मित्राच्या चितेवर त्याने उडी मारली अन्...

UP News : मित्राच्या अंतिम संस्कारादरम्यान, त्याच्या मित्रानेही जळत्या चितेत उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये समोर आला आहे. दोन्ही मित्रांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आकाश नेटके | Updated: May 28, 2023, 10:58 AM IST
मैत्री की वेडेपणा? कॅन्सरने मृत्यू झालेल्या मित्राच्या चितेवर त्याने उडी मारली अन्... title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Shocking News : प्रत्येकाच्याच आयुष्यात मैत्रीच्या (friendship) नात्याला महत्त्वाचं स्थान असतं. प्रत्येकजण आपल्या मित्रासाठी काहीही करायला तयार असतात. दोस्तीसाठी काही पण करायला लावणारी अशी अनेक उदाहरणे या जगात सापडतील. निःस्वार्थी आणि रक्तापलीकडील मैत्रीच्या या नात्यासाठी अनेक जण आपला प्राण देखील तयार होतात असंही पाहायाला मिळतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP News) घडलाय. मित्राच्या मृत्यूनंतर दुःख सहन न झाल्याने एका व्यक्तीने त्याच्याच चितेत (funeral) उडी घेऊन स्वतःला संपवलं आहे.

तरुणाच्या अंतिम संस्कारादरम्यान, त्याच्या मित्राने जळत्या चितेत उडी मारल्याने शनिवारी उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार पोलीस स्टेशन परिसरात एकाचा मृत्यू झालाय. शनिवारी यमुना नदीच्या काठावर मित्राच्या चितेत उडी मारल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

कर्करोगाने त्रस्त तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांनी मृतदेह यमुनेच्या काठावरील सरुपूर घाटावर नेला. चितेला अग्नी दिल्यानंतर अंतिम संस्कार करून कुटुंबीय परतले. मात्र काही लोक तिथेच थांबले. दरम्यान, मृताचा मित्र तेथे पोहोचला आणि मित्राच्या जळत्या चितेवर जाऊन झोपला. लोकांनी त्याची समजूत काढत त्याला तिथून बाहेर काढले पण तोपर्यंत तो गंभीररित्या भाजला होता. त्याच अवस्थेत नातेवाईकांनी तरुणाला शासकीय ट्रॉमा सेंटर गाठले होते. मात्र त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला आग्रा येथे हलवण्याचा निर्णय घेतला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तरुणााला आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अशोक कुमार यांचा मुलगा रामबाबू आणि नादिया गावातील आनंद गौरव राजपूत (42) यांच्यात घट्ट मैत्री होती. अशोक कर्करोगाने त्रस्त होता. शनिवारी सकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. अशोकच्या मृत्यूनंतर कुटुंबात सर्वांनाच धक्का बसला होता. अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांनी अशोकचा मृतदेह यमुनेच्या काठावरील सरुपूर घाटावर नेला. तिथे अशोक कुमारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता जाळल्यावर लोक आपापल्या घरी गेले. तर काही लोक तिथेच उपस्थित होते.

त्यानंतर अशोकचा मित्र आनंद गौरव रडत तिथे पोहोचला. काही कळण्याच्या आत तो अशोकच्या चितेवर जाऊन झोपला. जळत्या निखाऱ्यांवर पडल्याने तो गंभीररित्या भाजला होता. तरुणाला चितेवर पडलेले पाहून लोकांनी त्याला बाहेर काढले. आनंदला जळत्या चितेतून उचलून लोकांनी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आग्रा येथे हलवण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आनंद 90 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती खालवली होती. त्यामुळे अशोक कुमारनंतर आनंदचाही मृत्यू झाला.