देशात आज, उद्या ९३ लाख ट्रक, ५० लाख बस धावणार नाहीत

 ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) च्या आवाहनानंतर रविवारी रात्री १२ वाजता हा स्ट्राइक सुरु झाला.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2017, 09:55 AM IST
देशात आज, उद्या ९३ लाख ट्रक, ५० लाख बस धावणार नाहीत title=

नवी दिल्ली: ट्रान्सपोर्टवरील जीएसटी अद्याप स्पष्ट न झाल्याने तसेच डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने ट्रक ऑपरेटर्सनी देशभरात संपाची हाक दिली आहे.  ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) च्या आवाहनानंतर रविवारी रात्री १२ वाजता हा स्ट्राइक सुरु झाला. त्यामुळे माल बुकींग आणि डिलिव्हरी येत्या दोन दिवसांत चालणार नाही. 

डीझेल-पेट्रोलला जीएसटी क्षेत्रात घ्यावे अशी मागणीही होत आहे. देशभरात सुमारे ९३ लाख ट्रक एआयएमसीसी बॅनरखाली या बंद मध्ये सहभागी झाल्याने ते रस्त्यावर दिसणार नाहीत. ९ आणि १० ऑक्टोबर रोजी चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे अध्यक्ष एस. के. मित्तल यांनी पत्रकारांना सांगितले. वाहतूकदारांची सर्वोंच्च संघटना असलेल्या एआयएमटीसीने साधारण ९३ लाख ट्रक ऑपरेटर्स आणि सुमारे ५० लाख बसेस आणि टुरिस्ट ऑपरेटरचे प्रतिनिधित्व करीत आहे. दरम्यान वाहतूकदारांची दूसरी संघटना असलेल्या अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर वेल्फेअर असोशिएशनने एआयएमटीसीला पाठिंबा दर्शविला आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर वाहतूक व्यवसायावर वाईट परिणाम झाला. त्यामूळे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) आणि इतर ट्रांसपोर्ट असोसिएशनने दोन दिवसांच्या राष्ट्रीय आंदोलनाची हाक दिल्याचे कलकत्ता गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रभात कुमार मित्तल यांनी सांगितले. जीएसटी अंतर्गत विविध धोरणांमुळे रस्ते वाहतूक क्षेत्रातील गोंधळ आणि विघटन मोठ्या प्रमाणात झाल्याचेही ते म्हणाले. "डिझेलच्या दरात वाढ आणि दरांमध्ये दररोजच्या चढउतारांमुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होत आहे. डिझेल आणि टोलचा खर्च ट्रॅक्टरच्या एकूण खर्चाच्या ७० टक्के जास्त असल्याचे मित्तल यावेळी म्हणाले.

हाथरस ट्रक असोसिएशनचा विरोध 

हाथरस पार्कचुन ट्रान्सपोर्ट आणि मिनी ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या स्ट्राइकला विरोध केला आहे. ते केवळ एक काळी पट्टी बांधून काम करणार आहेत. अशाप्रकारे आंदोलन करुन एका दिवसात साधारण सव्वा कोटी रुपयांच्या टर्नओव्हरवर परिणाम होईल असे संघटनेचे अध्यक्ष किशन लाल यांनी सांगितले.