-४० डिग्री तपमानातही हे बूट करणार जवानांचं संरक्षण

भारतीय जवानांसाठी आता सरकारने एक मोठं पाऊल उचललंय

Updated: Dec 21, 2018, 04:19 PM IST
-४० डिग्री तपमानातही हे बूट करणार जवानांचं संरक्षण title=

नवी दिल्ली : सियाचीनमध्ये उणे ४० अंश तापमानात देशात रक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांसाठी आता खास बातमी... आर्मीने सियाचीनमधल्या सैनिकांसाठी खास बूट तयार केलेत. हे बूट देशातच तयार करण्यात आलेत. 

सियाचीन... २२ हजार फूट उंचीवर असलेली भारताची सीमा... इथे एक सेकंदही उभं राहणं सर्वसामान्य व्यक्तीसाठी अशक्य... रक्त गोठवणारी थंडी इथे असते. सियाचीनमध्ये सातत्याने होते भयानक बर्फवृष्टी... मात्र अशा मरणप्राय वातावरणातही उणे ४० अंश तापमानातही आपले जवान सीमेचं रक्षण करतात. २४ तास डोळ्यात तेल घालून खडा पहारा करतात आपले शूरवीर... या जवानांसाठी आता भारत सरकारने एक मोठं पाऊल उचललंय. 

मेक इन इंडिया अंतर्गत सैनिकांसाठी खास बूट तयार करण्यात आलेत. अगदी कमी तापमानातही हे बूट वापरता येऊ शकतात. या बुटांच्या खडतर चाचण्या डीआरडीओने घेतल्या आहेत. याआधी वापरल्या जाणाऱ्या परदेशी बुटांपेक्षा हे बूट वजनाने हलके आहेत. तसंच हे बूट जास्त आरामदायक आणि वापरण्यास सोपे आहेत. 

पहिल्यांदाच सियाचीनमधल्या सैनिकांसाठी देशांतर्गत बूट तयार करण्यात आलेत. याआधी असे बूट आयात केले जात होते. मात्र, आता देशातच हे बूट तयार झाल्याने त्यांचा खर्च तब्बल ७ टक्क्यांनी कमी होणार आहे.