तलवार दाम्पत्याला कारागृहात दररोज मिळत होते ४० रुपये

बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणातून राजेश-नुपूर तलवार या दोघांची अलाहाबाद न्यायालयाने सुटका केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 12, 2017, 05:56 PM IST
तलवार दाम्पत्याला कारागृहात दररोज मिळत होते ४० रुपये title=
File Photo

नवी दिल्ली : बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणातून राजेश-नुपूर तलवार या दोघांची अलाहाबाद न्यायालयाने सुटका केली आहे.

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेलं तलवार दाम्पत्याने शिक्षेविरोधात अलाहाबाद न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने राजेश आणि नुपूर तलवार यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

२००८ साली आरुषी आणि हेमराज या दोघांची हत्या झाल्यानंतर २०१३मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायलयाने  राजेश आणि नुपूर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे दोघेही सध्या गाझियाबाद येथील डासना तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.

राजेश तलवार हे कारागृहातील मेडिकल टीमचा एक भाग होते आणि त्यांची पत्नी नुपूर तलवार या कैद्यांना शिकविण्याचं काम करत असतं. राजेश हे दंत चिकित्‍सक म्हणून आपली सेवा देत होते आणि त्यांना दररोज ४० रुपये मिळत असतं. म्हणजेच महिन्याला राजेश तलवार यांना १२०० रुपये मिळत असतं.

त्याचप्रमाणे नुपूर तलवार या महिलांना आणि मुलांना शिकवण्याचं काम करत होत्या. या कामाचे नुपूर तलवार यांना दररोज ४० रुपये मिळत असतं. त्या सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिकवण्याचं काम करत होत्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

१६ मे २००८ साली तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी आपल्याच बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. सुरुवातीला घरातील नोकर हेमराज याच्यावर संशय आला मात्र, दुसऱ्याच दिवशी हेमराज याचाही मृतदेह घराच्या छतावर आढळला. या बहुचर्चित दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तलवार दाम्पत्याला दोषी ठरवलं. त्यासोबतच त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात तलवार दाम्पत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.