राजकीय घडामोडींदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राजस्थानच्या सीमा सील

आमदारांना राज्यातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी सीमेवर सतर्कता वाढवली.

Updated: Jul 12, 2020, 10:03 AM IST
राजकीय घडामोडींदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राजस्थानच्या सीमा सील title=

जयपूर : राजस्थानमधील राजकीय घडामोडींदरम्यान राज्याच्या सीमा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. राजस्थान सरकारच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. सरकारच्या आदेशानुसार वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्याच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याला राजस्थानबाहेर जायचे आहे, त्याच्याकडे पास असणे आवश्यक आहे.

राजस्थानच्या हद्दी सील करण्याचा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा राज्यातील काँग्रेसचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. भारतीय जनता पार्टी राज्यात काँग्रेसचे सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे.

सध्या राजस्थानच्या सीमेवर दक्षता आहे. आमदारांना राज्यातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी राजस्थान सीमा नियंत्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सीमेवर पोलिसांनी सतर्कता वाढविली आहे. तसेच महामार्गावर विशेष नाकाबंदी सुरू आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था सौरभ श्रीवास्तव यांनी सीमा नियंत्रित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

राजस्थानमध्ये राजकीय घडामोडी

राज्यात काँग्रेसचे सरकार पाडण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) भाजपच्या दोन नेत्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या भाजप नेत्यांवर काँग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविल्याचा आरोप आहे. तसेच अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) तीन आमदारांविरोधात घोडे व्यापार केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या व्यतिरिक्त अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला, सुरेश टांक आणि काँग्रेसचे आमदार सुखबीरसिंग जोजावर यांचादेखील समावेश आहे.