पावसाचं थैमान: मुसळधार पावसाचे देशभरात ५५ बळी

...

Updated: Jun 9, 2018, 02:02 PM IST
पावसाचं थैमान: मुसळधार पावसाचे देशभरात ५५ बळी title=
Image: ANI

नवी दिल्ली : उत्तर भारतासह देशातील विविध भागांत कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, देशातील अनेक भागांत वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. एकीकडे नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे अतिवृष्टीचा नागरिकांना फटका बसला आहे. शुक्रवारी (८ जून) रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसात ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू 

८ जून रोजी वादळीवारा आणि पावसामुळे उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्युची नोंद झाली आहे. आतापर्यंत २४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोद करण्यात आली आहे तर, १२४ नागरिक जखमी झाले आहेत. जौनपुर आणि सुल्तानपुरमध्ये ५, उन्नावमध्ये ४, चंदोलीत ३ आणि बहराइचमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच रायबरेलीत २ आणि वाराणसी, मिर्झापूर, आजमगढमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसाची शक्यता

पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील अनेक राज्यांत जोरदार पाऊस कोसळणार आहे. यामध्ये मुंबई, कोकण, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेशपासून पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

मृतकांचा आकडा वाढला 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या वादळीवारा आणि पावसामुळे ओडिसामधअये ११, उत्तर प्रदेशात २४, मध्य प्रदेशात ४, बिहारमध्ये ९ आणि झारखंडमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.