राजकारणात यायचंय तर JNU, काश्मीर मुद्द्यावर मतं मांडा; रजनीकांत य़ांना इशारा

. 'रजनीकांत यांच्यासाठी पेरियारचा मुद्दा वादविदाचा विषय ठरत आहे का?'

Updated: Jan 22, 2020, 01:57 PM IST
राजकारणात यायचंय तर JNU, काश्मीर मुद्द्यावर मतं मांडा; रजनीकांत य़ांना इशारा  title=
रजनीकांत

नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकारणात नवी कारकिर्द सुरु करु पाहणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांनी १९७१मधील पेरियार रॅलीविषयी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. रजनीकांत यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी त्यांचं वक्तव्यच चुकीचं असल्याचं ठरवलं. 

रजनीकांत यांना राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असेलच तर त्यांनी, नागरिकत्व सुधारणा कायदा, काश्मीर मुद्दा आणि जेएनयू अशा विषयांवर मतप्रदर्सन करावं असं कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केलं. 'रजनीकांत यांच्यासाठी पेरियारचा मुद्दा वादविदाचा विषय ठरत आहे का?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

#CAAProtest #JNUattack #Kashmir अशा हॅशटॅगचा उल्लेख करत, देशव्यापी विषय अधोरेखित करत रजनीकांत यांनी आपली मतं मांडावीत असा सूरही त्यांनी आळवला. यावर आता रजनीकांत यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

काय आहे वादाचा मुद्दा? 

पेरियारविषयी रजनीकांत यांच्या वक्तव्यावरुन आता तामिळनाडूच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली आहे. इतकंच नव्हे तर, त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. पण, रजनीकांत यांनी मात्र आपल्या भूमिकेविषयी माफी मागण्याल स्पष्ट नकार दिला आहे. 

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये रजनीकांत यांनी दावा केला होता की पेरियारने १९७१ मध्ये सलेम येथे एक रॅली काढली होती. ज्यामध्ये देवदेवतांची विवस्त्र छायाचित्र होती. रजनीकांत यांच्या याच वक्तव्यावरुन द्रविदार विधुतलाई कझगमच्या सदस्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. 

दरम्यान, माध्यमांशी चर्चा करत असताना पेरियार रॅलीविषयी आपण जे सांगितलं ते सर्वकाही सत्य असल्याचं सांगितलं. माहितीच्या आधारे हे वक्तव्य करण्यात आलेलं असलं तरीही तेव्हा अनेक वृत्तपत्रांनी प्राधान्याने हे वृत्त छापल्याचा खुलासा करत आता आपण याबाबत दिलगिरी व्यक्त करणार नसल्याचं ठामपणे सांगितलं.