मोदींनी जनतेचा विश्वासघात केलाय, विरोधकांची टीका

४ वर्षात मोदी सरकारने जनतेच्या खिशाला कात्री लावली अशा शब्दात भाकपने हल्लाबोल केलाय. 

Updated: May 26, 2018, 08:18 PM IST

नवी दिल्ली : एकीकडं नरेंद्र मोदी सरकार चौथी वर्षपूर्ती साजरी करत असताना, काँग्रेसनं आज देशभरात विश्वासघात दिवस पाळून सरकारचा निषेध केला. सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका बसपा अध्यक्षा मायावती यांनी केलीय. तर ४ वर्षात मोदी सरकारने जनतेच्या खिशाला कात्री लावली अशा शब्दात भाकपने हल्लाबोल केलाय. 

दरम्यान, भारत प्रगतीच्या दिशेनं घोडदौड करत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशामधील जाहीर सभेत बोलताना केला. तर केंद्रात २०१९ साली पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला चार वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी भाजप सरकारच्या विकासाचा पाढा वाचला. २०१९च्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपनं साफ नियत, सही विकास-२०१९ में फिर से मोदी सरकार असा नारा दिलाय.