'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2018, 07:58 PM IST
'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. पोटनिवडणुकीत मोठी हार झाल्याने पैशाचा वापर आणि सरकारी यंत्रणेचा दूरउपयोग करत हा विजय मिळवल्याचा दावा, मायावती यांनी केलाय. बसपने आपला एक उमेदवार या निवडणुकीत उभा केला होता. मात्र, ही जागा भाजपने जिंकली. पण भाजपने बसप आणि सपाच्या मतांमध्ये फाटाफूट घडवून अनिल अग्रवाल यांच्या रुपाने आपला नववा उमेदवारही निवडून आणला. जिंकलेली जागा ही भाजपने पैशाच्या बळावर जिंकलेय, असे सांगत भाजपवर जोरदार टीका मायावती यांनी केली. 'भाजपाची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', असा निर्धार त्यांनी केलाय.

मायावती यांचा इशारा

राज्यसभा निवडणुकीत बसपच्या उमेदवाराचा पराभव करुन माझ्यामध्ये आणि समाजवादी पार्टीमध्ये भांडण लावून देण्याचा भाजपचा डाव होता. मात्र, हा त्यांचा कुटील डाव यशस्वी होणार नाही. मायावती गरम डोक्याची आहे, ती लगेच समाजवादी पार्टीबरोबर आघाडी मोडण्याचा निर्णय घेईल, असे भाजपला वाटत आहे. पण ते चुकीचे आहे. असे काहीही होणार नाही. आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून दिली जाईल, अशा इशारा मायावती यांनी यावेळी दिला.

सरकारी दहशत आणि भिती

मायावती यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केलाय. सरकारी दहशत आणि भिती निर्माण करुन तशी परिस्थिती निर्माण केली आणि पैशाची निवडणूक जिंकली. तसेच भाजपने काही आमदारांना घाबरविले आणि धमकी दिली. त्यामुळे काही आमदारांनी क्रॉस मतदान केले. मात्र, जे आमदार घाबरले नाहीत आणि ते आपल्या निर्णायवर ठाम राहिले, त्यांचे मी अभिनंत करते.

अखिलेश हे राजकारणात तसे नवीन 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे राजकारणात तसे नवीन आहेत. ते हळूहळू राजकीय डावपेज चांगले शिकतील. त्यांची थोडी चूक झाली. मी त्यांच्या जागी असते तर पहिल्यांदा सपाच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न केला असता. अखिलेश यादव कचऱ्यातील गुंड (राजा भैय्या) यांच्या माकड जाळ्यात फसले. नाही तर त्यांनी ही जागा आपल्याकडे राखली असती, असे प्रतिपादन मायावती यांनी यावेळी केले.