भाजपची २९ पक्षांसोबत युती, बदलत्या समीकरणांमुळे मात्र नरमाईची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ मित्रपक्षांसोबत हात मिळवणी

Updated: Mar 12, 2019, 02:28 PM IST
भाजपची २९ पक्षांसोबत युती, बदलत्या समीकरणांमुळे मात्र नरमाईची भूमिका title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त पक्षांसोबत हात मिळवणी करत आहे. पण सोबतच भाजपला यासाठी थोडं नमतं देखील घ्यावं लागत आहे. 2014 मध्ये भाजपने 16 प्रादेशिक पक्षांसोबत लोकसभा निवडणूक लढवली होती. पण आता हा आकडा 29 वर पोहोचला आहे. बिहारमध्ये 40 पैकी 22 जागा जिंकणारा भाजप आता 17 जागा लढवणार आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षासाठी बाकी जागा सोडल्या आहेत. पराभव झालेल्या जागांवर भाजप आपले उमेदवार देऊ शकते. बिहारची नवादा सीट एलजेपीकडे आहे. दुसरीकडे जेडीयू देखील भाजपने जिंकलेल्या काही जागा मागू शकते. 

झारखंडमध्ये भाजपला मोठी माघार घ्यावी लागली आहे. झारखंडमधील गिरिडीहमधून भाजपने लागोपाठ ५ वेळा विजय मिळवला आहे. पण यंदा एजेएसयूसाठी त्यांनी ही जागा सोडली आहे. 

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत, तमिळनाडूत एआयएडीएमके सोबत युती केली असून डीएमडीके देखील युतीत सामावून घेतलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. राजभर सुहेलदेव यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या ६ नेत्यांना आणि अपना दलच्या ७ नेत्यांना त्यांनी वेगवेगळ्या महामंडळांवर नियुक्त केलं आहे. 

दुसरीकडे विरोधी पक्ष देखील एकत्र येत आहेत. अनेकदा विरोधक एकाच मंचावर एकत्र दिसले. काँग्रेससह सगळेच भाजप विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 11 एप्रिला,18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे आणि १२ मे असं सात टप्प्यांमध्ये हे मतदान होणार आहे. २३ मेला मतमोजणी होणार आहे.