'शेतकरी आंदोलनात बलात्कार झाले, मृतदेह लटकत होते', कंगनाचा आरोप; म्हणाली, 'अमेरिका...'

Kangana Ranaut On Farmers Protest: एका मुलाखतीमध्ये कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात धक्कादायक आरोप केले असून या आरोपांमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही कंगनाने शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 26, 2024, 09:50 AM IST
'शेतकरी आंदोलनात बलात्कार झाले, मृतदेह लटकत होते', कंगनाचा आरोप; म्हणाली, 'अमेरिका...' title=
एका मुलाखतीमध्ये केला धक्कादायक आरोप

Kangana Ranaut On Farmers Protest: लोकसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक जिंकलेली अभिनेत्री आणि विद्यमान खासदार कंगना राणौत पुन्हा वादात अडकण्याची दाट शक्यता आहे. कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना, या आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान अनेक महिलांची हत्या झाल्याचंही कंगनाने म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगानाने ही विधानं केली आहेत.

देशाचं नेतृत्व सशक्त नसतं तर...

देशाचं नेतृत्व सशक्त नसतं तर भारताची परिस्थिती बांगलादेशसारखी परिस्थिती झाली असती असंही कंगनाने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. तसेच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने कृषी विधेयक मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता असा दावाही कंगनाने केला आहे. या आंदोलनाच्या नावाखाली या सर्वांचा खूप वेगळं प्लॅनिंग सुरु होतं, असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाच्या या विधानावरुन आता काँग्रेससहीत विरोधी पक्षांनी टीका केली आहे. 

कंगना नेमकं काय म्हणाली?

"आपल्या देशातील नेतृत्व सशक्त नसतं तर बांगलादेशमध्ये जे घडलं ते आपल्या घडायला वेळ लागला नसता. आपल्या इथे जी शेतकरी आंदोलनं झाली तिथे मृतदेह लटकत होते. बलात्कार होत होते," असं कंगना मुलाखतीमध्ये म्हणाली. "शेतकऱ्यांच्या हिताचं विधेयक मागे घेण्यात आलं तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसला होता. ते शेतकरी आजही तिथे बसले आहेत. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की विधेयक मागे घेतलं जाईल. फार मोठी प्लॅनिंग होती. अगदी बंगलादेशसारखी," असं कंगना म्हणाली. "अशा षड्यंत्रांमध्ये शेतकरी होते असं तुम्हाला वाटतं का? नाही यामागे चीन, अमेरिकेसारख्या परकीय शक्ती येथे काम करत आहेत. या फिल्मी लोकांना वाटतं की हे असं चालू राहिल. देश खड्ड्यात गेला तरी चालेल असं यांना वाटतं. पण असं होतं नाही. देश खड्ड्यात गेला तर तुम्हीही खड्ड्यात जाणार हे यांना रोज आठवण करुन दिलं पाहिजे. मात्र जेवढी यांची बुद्धी आहे तेवढ्याच त्यांच्या कुरापती आहेत," असा टोला कंगनाने आंदोलनकर्त्यांबद्दल बोलताना लगावला.

काँग्रेसची कठोर शब्दांमध्ये टीका

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी या विषयावरुन कंगनावर टीका केली आहे. "भाजपाची खासदार अन्नदात्यांना बलात्कारी आणि हत्या करणारे म्हणत आहे. याचं उत्तर हरियाणा पुढील काही दिवसांमध्ये देईल," असं सुप्रिया यांनी ट्वीटरवरुन म्हटलं आहे. तसेच अन्य एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री रनवीत बिट्टू यांना टॅग करुन सुप्रिया यांनी, "तुमची खासदार कंगनाने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बलात्कारी आणि खूनी म्हटलं आहे. तुम्हालाही असं वाटतं का? तुमची याला विरोध करण्याची हिंमत आहे का? तुमचं रक्त खवळत नाही का? संसदेमध्ये नाटक करत राहणार की शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणार?" असे प्रश्न विचारले आहेत.