रत्नागिरी, गुजरातला 'वायू' चक्रीवादळाचा धोका, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट'वर

एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी १० टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत

Updated: Jun 12, 2019, 09:05 AM IST
रत्नागिरी, गुजरातला 'वायू' चक्रीवादळाचा धोका, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट'वर title=

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवादळ १३ जूनला गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. १३० ते १३५ किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. 

एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी १० टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. 

टेहळणी विमान आणि हेलिकॉप्टर्समधूनही परिस्थितीची पाहणी सुरू आहे. किनारपट्टी भागातल्या सर्व पर्यटकांनी सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दिल्या आहेत. या चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गृहमंत्रालयाने अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. 

सौराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील भागांमध्ये १४ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची तसंच ११० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे सुटण्याची सुचना जारी केली आहे. या वायू चक्रीवादळाचा मान्सूनवरही प्रभाव पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

रत्नागिरी किनारपट्टीवरही 'वायू'चा परिणाम

हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे 'वायू' वादळाचा परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. वादळी वाऱ्याचा जोर आज अचानक वाढल्‍याचे दिसून येत आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या अक्राळ-विक्राळ लाटांनी हाहाकार माजवला आहे. अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, मिऱ्या, मुरुड आणि हर्णे भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी शिरकाव केला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे मच्छीमारांनी आपल्या होड्या सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत. रत्नागिरीत चीनच्या १० जहाजांना थांबण्याची परवानगी देण्यात आलीय.  वायू चक्रीवादळामुळे चिनी जहाजं जयगड बंदर आणि परिसरात थांबली आहेत, अशी माहिती कोस्टगार्डने केलीय. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू वादळाचा फटका मॉन्सूनच्या आगमनावर झाला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, सोमवारी सायंकाळपासून किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा जोर वाढला आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागास बसत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून, समुद्र खवळला आहे. यामुळे किणार्‍यावर समुद्री लाटांचे रौद्ररूप दिसून येत आहे. समुद्रातील वायू वादळाचा परिणाम किनारपट्टीवर जाणवत असून, वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.