यूएईची केरळला ७०० कोटींची आर्थिक मदत

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारनं तब्बल ७०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 21, 2018, 10:22 PM IST
यूएईची केरळला ७०० कोटींची आर्थिक मदत title=

अबू धाबी : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारनं तब्बल ७०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. आखाती देशांमध्ये केरळमधील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. आखाती देशांच्या उभारणीत मल्याळी नागरिकांचा मोलाचा सहभाग आहे. त्यामुळंच यूएई सरकारनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १०० दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत दिलीय, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी आज दिली. 

Kerala: India unlikely to accept foreign donations for flood relief operations

अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन सय्यद अल नह्यान यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबतीत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही ७०० कोटी रूपयांची मदत दिल्याचंही विजयन यांनी सांगितलं. तर केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी आतापर्यंत सुमारे ४५० कोटी रूपयांची मदत केलीय.

केरळमध्ये ११ हजार गावं उद्धवस्त, ७ लाखांहून अधिक लोकं बेघर

केरळमध्ये जीवित आणि वित्त हानीचं भीषण वास्तवही आता समोर आलं आहे. ११ हजार गावं उद्धवस्त झाली आहेत. २६ लाख घरांना अजूनही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. ४६ हजार हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. काल दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या सहा दिवसातील मृतांचा आकडा २५२वर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे साडे चारशे जणांनी पावसामुळे प्राण गमावले आहेत. 

केरळ: पावसाचा जोर ओसरला; पूरग्रस्तांना मोठा दिलासा

दरम्यान, निसर्गाच्या अवकृपेनं पाण्याखाली गेलेल्या केरळच्या जनतेला गेल्या ३६ तासात मोठा दिलासा मिळालाय. पावसाचा जोर आता ओसरलाय. पुढच्या चार दिवसात पाऊस हळहळू कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे पुराच्या तडख्यात सापडलेल्या केरळच्या नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय.

दरम्यान गेल्या ४८ तासात मदत कार्यासाठी उतरलेल्या एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि वायूसेनेच्या हजारो सैनिकांच्या प्रयत्नांनाही मोठं यश मिळातंय. जवळपास चार लाख लोकांना मदत छावण्यामध्ये हलवण्यात आलं. तर शेकडो टन अत्यावश्यक वस्तू आता पुरात अडकलेल्या जनतेला वाटण्यात आल्या आहेत. आणखी काही दिवस मदत आणि बचाव कार्य असंच युद्ध पातळीवर सुरु राहणार आहे.