सय्यद शूजाविरोधात निवडणूक आयोगाची पोलिसांकडे तक्रार

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Updated: Jan 22, 2019, 07:18 PM IST
सय्यद शूजाविरोधात निवडणूक आयोगाची पोलिसांकडे तक्रार title=

नवी दिल्ली : २०१४ च्या निवडणुकीत मतदानयंत्रांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करणारा स्वयंघोषित सायबरतज्ज्ञ सय्यद शूजा याच्याविरोधात निवडणूक आयोगानं दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. लंडनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेऊन शुजानं गंभीर आरोप केले आहेत. गोपिनाथ मुंडेंच्या मृत्यूबद्दलही त्यानं संशय व्यक्त केला आहे. आपण मतदानयंत्र तयार करणाऱ्या चमूचे सदस्य असल्याचाही शुजाचा दावा आहे. पोलिसांनी या आरोपांची सुयोग्य चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगानं आपल्या तक्रारीत केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने केला होता. लंडन येथील या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर होते. यावेळी सय्यद शुजा याने म्हटले की, २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले होते. यानंतर झालेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही हा प्रकार घडला होता. दिल्लीतील २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता. परंतु, आम्ही वेळीच दुर्घटना रोखली. अन्यथा ही निवडणुकही भाजपने जिंकली असती असे शुजाने म्हटले होते. 

शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लिमिटेडचा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता. त्याने भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्स डिझाईन केली होती. ग्रेफाईट ट्रान्समीटरच्या मदतीने या ईव्हीएम मशिन्स उघडता येतात. २०१४ मध्ये भाजपने या ट्रान्समीटरचा वापर केला होता. यानंतरच्या काळात माझ्यावर आणि सहकाऱ्यांवर हल्ले झाल्याचेही शुजाने म्हटलं आहे.

पण हे प्रकरण त्यांच्याच अंगाशी येण्याची भीती आहे. लंडनमधील पत्रकार परिषदेत भारतीय मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला. लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वात महत्वाच्या उत्सवाला गालबोट लावण्यात आले. पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपनं मतदान यंत्र कशी हॅक केली?. मतदान यंत्रणा हॅक झाल्याचं शुजाला माहित होतं, तर तो कालपर्यंत गप्प का होता?

काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल एकटेच या पत्रकार परिषदेत काय करत होते?. भारताविषयीच्या इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर इंडियन जर्नलिस्ट असोशिएशननं शुजाला लंडनमध्ये व्यासपीठ का दिलं?. 2018 मध्ये काँग्रेसनं ज्या विधानसभा निवडणुका जिंकल्या त्यावेळी मतदानयंत्रात छेडछाड झाली नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत.