पालघर, अरुणाचल आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के

देशातच नाही जगभरात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत.

Updated: Sep 6, 2020, 08:56 AM IST
पालघर, अरुणाचल आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के title=

नवी दिल्ली : अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी पहाटे 6.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी मोजली गेली.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीच्या खाली 82 किलोमीटरवर होते.

महाराष्ट्रातील पालघरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.5 इतकी होती. एनसीएसच्या मते, भूंकपाचं केंद्र जमिनीच्या खाली 5 किलोमीटरवर होते.

पहाटे साडेचार वाजता पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. दुसरीकडे निकोबार ते अरुणाचलपर्यंत भूकंपाचा हादर जाणवला. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे 3.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तवांग येथे सकाळी 7.30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात भूंकपाचे धक्के जाणवत आहेत. 4 सप्टेंबरला महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे भूकंपाचा धक्का जाणवला. सुदैवाने या दरम्यान कोणतंही नुकसान झालेलं नाही.