२५ मे पासून देशातंर्गत विमान वाहतूक सेवा होणार सुरू

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे.   

Updated: May 20, 2020, 06:23 PM IST
२५ मे पासून देशातंर्गत विमान वाहतूक सेवा होणार सुरू title=

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढवण्यात येत आहे. पण चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर २५ तारखेपासून देशातंर्गत विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर देशातील अंतर्गत विमान सेवा पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. 

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, सर्व विमानतळ आणि विमान कंपन्यांना २५ मेपासून अनुक्रमे देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय यासंदर्भात मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्‍पेशल ऑपरेटिंग प्रॉसीजर (SOP)च्या माध्यमातून विशेष अटी आणि शर्तींची माहिती  देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, देशात आज कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. त्यापैकी ६१ हजार १४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४२ हजार २९८ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  तर ३ हजार ३०३ जणांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.