'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या'

२० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार 

Updated: Apr 2, 2020, 06:40 PM IST
'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या' title=

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशामध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. काही अपवाद वगळता देशभरातून याला संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय. देशामध्ये २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केल्याने २० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार आहे. उत्तर प्रदेशच्या शिव नादर विश्वविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांनी अभ्यासातून यासंदर्भातील हा निष्कर्ष काढला आहे.

कोरोनाची लक्षण आढळलेल्या व्यक्तींना एक-दोन दिवसांतच इतरांपासून वेगळे ठेवण्यात येते. देशात जर संचारबंदी लागू केली नसती तर कोरोना लागण होणाऱ्यांची संख्या २ लाख ७० हजार ३६० पर्यंत पोहोचली असती. तसेच ५ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला असता असे देखील या अभ्यासात म्हटले आहे. 

८० ते ९० टक्के जण सोशल डिस्टंसिंग पाळत असल्याचे आम्हाला वाटते असे विश्वविद्यालयाचे सहायक प्रोफेसर समित भट्टाचार्य सांगतात. लॉकडाऊनमुळे ८३ टक्के केसेस कमी होतील असे ते म्हणाले. सध्या सुरु असलेली स्थिती पाहता ३० हजार ७९० ऐवजी ३,५०० जण कोरोनाबाधित होऊ शकतील. तर ६०९ ऐवजी १०५ मृत्यू होऊ शकतील. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १,९६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये मरणाऱ्यांची संख्या ५० इतकी आहे.

लॉकडाऊनमुळे व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येण्याची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. आमचा अंदाज खरा ठरला तर पुढच्या १० ते २० दिवसांमध्ये ५ हजार ते ३० हजार ७९० पर्यंत कोरोनाग्रस्त आढळू शकतात.

तसेच लॉकडाऊन पाळला नसता तर २ लाख ७० हजार ३६० पर्यंत पोहोचली असती आणि ५,४०७ जण मृत्यूमुखींची संख्या असेल अशी शक्यता सहायक प्रोफेसर नागा सुरेश विरापु यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी केलेल्या सूचना 

१. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे

२. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
 
३. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता  राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन  वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

४.  कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ , यांचे टास्क फोर्स तयार करा , त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने  संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे ए करू नका. त्याची विभागणी करा . शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी  वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

९. ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.