"कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ....", प्रियांका गांधींनी सांगितली 32 वर्ष जुनी आठवण

Priyanka Gandhi on Rahul Gandhi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहदरम्यान (Sankalp Satyagrah) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून एका कुटुंबाचा अपमान करत असताना त्यांचं सदस्यत्व मात्र कायम राहतं अशी टीका यावेळी त्यांनी केली.   

Updated: Mar 26, 2023, 03:28 PM IST
"कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ....", प्रियांका गांधींनी सांगितली 32 वर्ष जुनी आठवण title=

Priyanka Gandhi Sankalp Satyagrah: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर दिल्लीत काँग्रेसने संकल्प सत्याग्रह (Sankalp Satyagrah) आयोजित केला आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आज एकदिवसीय संकल्प सत्याग्रह करण्यात येत आहे. दरम्यान दिल्लीत राजघाटवर संकल्प सत्याग्रहमध्ये सहभागी झालेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला. या देशाची लोकशाही माझ्या कुटुंबाच्या रक्ताने मोठी केली आहे असं प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटलं. तसंच केंद्रीय मंत्र्यांकडून वारंवार गांधी कुटुंबाचा अपमान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. 

प्रियांका गांधी यांनी यावेळी एक जुना किस्सा सांगितलं. "1991 मध्ये माझ्या वडिलांची अंत्ययात्रा तीन मूर्ती भवन येथून निघत होती. मी आपल्या आई आणि भावासोबत गाडीत बसलेली होती. समोर भारतीय लष्कराचा ट्रक होता. ट्रक पूर्पणणे फुलांनी भरलेला होता. त्या ट्रकमध्ये माझ्या वडिलांचा मृतदेह होता. थोड्या वेळानंतर राहुलने मला गाडीतून उतरायचं असल्याचं सांगितलं. तेव्हा माझ्या आईने सुरक्षेचा मुद्दा असल्याने नाही म्हटलं".

"पण नंतर राहुल गाडीतून खाली उतरले आणि लष्कराच्या मागून चालू लागले. कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेत चालत चालत तो इथे पोहोचला. या जागेपासून 500 फुटांच्या अंतरावर माझ्या भावाने वडिलांवर अंत्यसंस्कार केले," अशी आठवण प्रियांका गांधींनी सांगितली. 

"तो क्षण आजही माझ्या आठवणीत तसाच आहे. माझ्या वडिलांचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळलेला होता. त्याच्या मागे चालत चालत माझा भाऊ इथपर्यंत आला होता. पण आमच्या शहीद वडिलांचा वारंवार अपमान केला जातो. शहीदाच्या मुलाला तुम्ही देशद्रोही, मीर जाफर म्हणता आणि त्याच्या आईचा अपमान करा. केंद्र सरकार भरसंसदेत माझ्या आईचा अपमान करतं. एक मंत्री राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहेत माहिती नाही असं म्हणतो," असा संताप प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी कुटुंब नेहरु आडनाव का लावत नाही अशी विचारणा करतं. तुमच्यावर तर कोणती केस होत नाही, तुमचं सदस्यत्व रद्द होत नाही," अशी टीका प्रियांका गांधींनी केली. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की "ते नेहमी आमच्या कुटुंबाचा अपमान करतात. संसदेत माझ्या भावाने मोदींची गळाभेट घेतली आणि तुमचा द्वेष करत नाही असं सांगितलं. आमची विचारसरणी वेगळी आहे. आमची द्वेषाची विचारसरणी नाही".