येणारा काळ कठीण असेल, पण काँग्रेस या दिव्यातून पार पडेल- सोनिया गांधी

ही लढाई कितीही दीर्घकाळ सुरु राहिली तरी आम्ही लढू

Updated: May 27, 2019, 08:17 AM IST
येणारा काळ कठीण असेल, पण काँग्रेस या दिव्यातून पार पडेल- सोनिया गांधी title=

नवी दिल्ली: आगामी काळ हा काँग्रेस पक्षासाठी कठीण असेल. मात्र, या दिव्यातून काँग्रेस पक्ष नक्की पार पडेल, असा विश्वास संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून सोनिया विजयी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी पत्र लिहून रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. 

मात्र, या पत्रात सोनिया यांनी आगामी काळ हा काँग्रेस पक्षासाठी कठीण असेल, हेदेखील कबुल केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला माहिती आहे की, येणारे दिवस कठीण असतील. मात्र, तुमचा पाठिंबा आणि विश्वासाच्या जोरावर काँग्रेस पक्ष या दिव्यातूनही पार पडेल, असे सोनियांनी म्हटले आहे. ही लढाई कितीही दीर्घकाळ सुरु राहिली तरी, भारतीय संस्कृतीचा गाभा असलेल्या मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करायला मी कधीही मागेपुढे पाहणार नाही, असेही सोनियांनी पत्रात म्हटले आहे. 

काँग्रेस म्हणजे पेन्शनरांचा क्लब झालाय, बरखास्त करून टाका- शिवसेना

यावेळी सोनिया यांनी रायबरेलीच्या मतदारांचे मन:पूर्वक आभार मानले. काँग्रेस पक्षासह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमान दल यांनीही माझ्या विजयासाठी हातभार लावल्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. माझे आयुष्य म्हणजे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. तुम्ही माझे कुटुंब आहात. तुमच्यामुळे मला प्रेरणा मिळते, तिच माझी खरी संपत्ती आहे. मी रायबरेलीतील माझ्या कुटुंबाची हरप्रकारे काळजी घेण्याचे प्रयत्न केले आहेत, असेही सोनियांनी पत्रात म्हटले आहे. 

स्वत:च्या मुलांसाठी पक्षहित बाजूला सारलेत; राहुल गांधी बैठकीत 'या' नेत्यांवर संतापले