'हरलो तर अमित शाह जबाबदार असतील हे मोदींना दाखवायचे होते'

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी देखील याप्रकरणी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

Updated: May 18, 2019, 01:24 PM IST
'हरलो तर अमित शाह जबाबदार असतील हे मोदींना दाखवायचे होते'  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणार होते. पण पंतप्रधानांनी समोर असूनही प्रश्नांना उत्तरे देणे टाळले आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी ती कमान संभाळली. या पत्रकार परिषदेवर विरोधक सडकून टीका करत आहेत. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी देखील याप्रकरणी पंतप्रधानांवर टीका केली आहे.  निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने लागले नाहीत तर त्यासाठी अमित शाह जबाबदार असतील. हे सांगायलाच पंतप्रधान मोदी बहुदा पत्रकार परिषदेत हजर होते अशी टीका काँग्रेस नेते चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. कोण्या एका बुद्धीजीवीने म्हटलं होतं, 'मौनं सर्वार्थ साधनम्' बहुदा पंतप्रधानांची पत्रकार परिषद हे त्याचंच एक उदाहरण होत असेही ते पुढे म्हणाले आहेत.  

याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेवर हल्ला चढवला.

शुभेच्छा मोदीजी, खूप छान पत्रकार परिषद..पुढच्या वेळेस अमित शाह बहुदा तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देण्याची परवानगी देवोत..अशा बोचऱ्या शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

 

पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर पक्षाच्या शिस्तीनुसार अध्यक्ष सर्वश्रेष्ठ असल्यानं तेच उत्तरं देतील असं सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र, १७ मे २०१४ लाच इमानदारीची सुरूवात झाली होती, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी यावेळी दिली. मोदींनी यावेळी पाच वर्षांतील कामगिरीचा धावता आलेख मांडला आणि निवडणुकीच्या प्रचाराचेही अनुभव सांगितले. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीच उत्तरे दिली. एनडीएचे सरकार सत्तेत येणार असले तरी एकट्या भाजापला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे त्याचवेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मोदींना भ्रष्टाचारावर बोलण्याचे आव्हान दिले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होत आहे. आज सहा वाजता प्रचारतोफा थंडावत आहेत. तो धागा पकडून पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात झाली. एकप्रकारची सकारात्मकता यावेळी पाहायला मिळाली. यानिवडणुकीत आपल्याला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.