२०१४ मध्ये आजच्या दिवशी देशात ३० वर्षानंतर आलेलं बहुमताचं सरकार

२०१४ च्या तुलनेत भाजपला २०१९ मध्ये किती जागा मिळणार?

Updated: May 16, 2019, 12:11 PM IST
२०१४ मध्ये आजच्या दिवशी देशात ३० वर्षानंतर आलेलं बहुमताचं सरकार title=

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १६ मेला देशात मोदी लाट पाहायला मिळाली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने विरोधकांचा मोठा पराभव करत सत्ता मिळवली होती. ३ दशकानंतर देशात बहुमताचं सरकार आलं होतं. १९८४ मध्ये देशात बहुमताचं सरकार आलं होतं. याआधी देशात पाठिंबा घेत सरकार स्थापन करावं लागलं होतं. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असं अनेकांचं मत होतं पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल असं कोणी म्हटलं नव्हतं. भाजपच्या या विजयानंतर देशात आक्रमक सरकारचा उद्य झाला.

भारतात सोळावी लोकसभा निवडणूक ७ एप्रिल ते १२ मे दरम्यान ९ टप्प्यांमध्ये झाली. २०१४ ची निवडणूक इतिहासात सर्वात दिर्घकाळ झालेली निवडणूक ठरली होती. २०१४ मध्ये मतदारांमध्ये देखील उत्साह होता. देशात ६६.३८ टक्के मतदान झालं होतं.

१६ मेला आलेला निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक होते. जेव्हा २८२ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर एनडीएला ३३६ जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या. तर यूपीएला ५९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचा हा मोठा पराभव होता. कारण त्यांना मुख्य विरोधी पक्ष बनवण्यासाठी १० टक्के जागा म्हणजेच ५४ जागा आवश्यक होत्या.

मोदींसाठी अमेरिकेने दार उघडले

२००२ च्या गोधरा दंगलीनंतर अमेरिकेने मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना व्हीजा नाकारला बोता. पण २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वात प्रचंड विजयानंतर अमेरिकेने घोषणा केली होती की अमेरिका नरेंद्र मोदींसोबत काम करायला तयार आहे. अमेरिकेने मोदींना मिळालेल्य़ा बहुमतानंतर हा निर्णय घेतला होता. अनेक देशांना वाटतं होतं की मोदी यांना बहुमत मिळणार नाही.

कोणाला किती जागा?

२०१४ च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.

भाजप - २८२
काँग्रेस - ४४ 
एआयएडीएमके - ३७ 
बीजेडी - २०
टीडीपी - १६, 
तृणमूल काँग्रेस - ३४,
शिवसेना - १८ 
टीआरएस - ११  
सीपीआय(एम) - ९
राष्ट्रवादी - ६
सपा - ५ 
आप - ४
आकाली दल - ५
अपना दल - २ 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अनेक घोटाळे बाहेर आले होते. २जी घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा याला मुद्दा बनवत भाजपने काँग्रेसवर टीका केली. दुसरीकडे २०११ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे देशात काँग्रेस सरकारविरोधी लाट तयार झाली होती.

काँग्रेस यावेळी नेतृत्व संकटात होता. काँग्रेसकडे करिष्मा करणारं नेतृत्व नव्हतं. दुसरीकडे भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलं. मोदींनी गुजरात मॉडेल समोर ठेवलं. विकासावर बोलत त्यांनी आतापर्यंत चालत आलेल्या जाती-पातीचं राजकारण लांब ठेवलं.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजप मैदानात आहे. २०१४ च्या तुलनेत भाजपला २०१९ मध्ये किती जागा मिळतील याबाबत उत्सूकता आहे.