बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियम

Bike Safety : बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 24, 2024, 08:37 PM IST
बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्यास शिक्षा होणार, सरकारचा नवा नियम title=

Bike Safety Rules : एका रिपोर्टनुसार रस्ते अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार बाईक चालवताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणं आता दंडनीय अपराध असणार आहे. रस्ते अपघात (Road Accident) कमी करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. बाईक चालवत असताना मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलल्याने चालकाचं लक्ष विचलीत होऊ शकतं. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. अपघाताचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडल्यास बाईक स्वाराला (Bike Rider) आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे. 

मोटर वाहन विभागचा निर्णय
केरळ मोटर वाहन विभागाने (Kerala Motor Vehicle Division)  हा निर्णय घेतला आहे. रस्ते अपघाताल कारणीभूत असलेल्या कारणांचा अभ्यास करुन एक अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालत सर्वाधिक अपघात हे दुचाकीचे असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अहवालात दुचाकी अपघात टाळण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. बातचीत केल्याने बाईसस्वाराचं लक्ष विचलीत होऊ शकतं, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते असं नमुद करण्यात आलंय. 

याशिवाय बातचीत करत बाईक चालवल्याने ट्रॅफिक सिग्लन, पायी चालणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष होऊ शकतं, यामुळे देखील अपघात होऊ शकतात. तसंच मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलताना बाईकस्वाराला मान सारखी मागे वळवावी लागते यामुळे बाईकवरचं नियंत्रण सुटू शकण्याचा धोका असतो. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहन अपघातात चालकाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन अहवालात बाईक अपघात टाळण्याशिवाय उपया सुचवण्यात आले आहेत.

रस्ते अपघातात वाढ
देशात 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये रस्ते अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. किरकोळ तसंच गंभीर स्वरुपाच्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातांची अनेक धक्कादायक कारणं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. अतिवेगाने लवाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठं कारण असल्याचं रिपोर्टमध्ये देण्यात आलं आहे. याशिवाय, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातांच्या घटना वाढल्याचं सांगितलं जातंय. 

दुचाकी अपघातांची संख्या भितीदायक आहे. हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात दुचाकी अपघातात 50  हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातील 14 हजाराहून अधिक चालकांना हेल्मेट घातलं नव्हतं.