Congress | दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला?

5 राज्यांच्या कालच्या निकालांमुळे (assembly election 2022 results) काँग्रेसच्या (Congress) गोटात प्रचंड अस्वस्थता आहे.   

Updated: Mar 11, 2022, 11:01 PM IST
Congress | दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  5 राज्यांच्या कालच्या निकालांमुळे (assembly election 2022 results) काँग्रेसच्या (Congress) गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये (Congress Senior Leader Controversy) पुन्हा अंतर्गत कलह उफाळून आला असून पुन्हा एकदा नेतृत्वाबाबत शंकाकुशंका घेतल्या जातायत. (assembly election 2022 results effects on congres know how effect on party and senior leaders)

पाच राज्यांमध्ये काँग्रेसचं पुन्हा पानिपत झालंय. या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी सोनिया गांधींनी केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली असली, तरी काँग्रेसमधल्या जी-23 या गटाची वेगळी बैठक होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांमध्ये गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, कपिल शर्मा आदी 23 ज्येष्ठ काँग्रेस नेते भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

पराभवाच्या गर्तेत अडकलेला पक्ष आणखी गटांगळ्या खाऊ नये, या भावनेतून हे नेते आपल्या मागण्या पुन्हा एकदा नेतृत्वासमोर ठेऊ शकतात.

जी 23 म्हणजे काय?

2020 साली काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनियांना पत्र लिहिलं होतं. पक्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर नेतृत्वासह अनेक मोठे बदल करावे लागतील असा आग्रह जी 23नं धरला होता. पक्षांतर्गत निवडणुका, पूर्णवेळ अध्यक्ष अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.ताज्या पराभवानंतर पुन्हा या नेत्यांनी आपल्या मागण्या लावून धरण्यास सुरूवात केलीय.

एकामागोमाग एक वेगवगेळ्या राज्यांमध्ये पक्षाचा पराभव पाहून मनाला फार उदास वाटतं. मला विश्वास आहे की मी आणि माझे काही सहकारी मागील बऱ्याच काळापासून ज्याबद्दल भाष्य करतोय त्या सर्व मुद्द्यांवर पक्ष नेतृत्व लक्ष देईल, अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दिलीये. तर खासदार शशी थरूर यांनी ट्विट करून नेतृत्वबदलाची गरज व्यक्त केली.

ज्या विचारांसाठी आणि देशाला सकारात्मक अजेंडा देण्यासाठी काँग्रेस कायम उभी राहिलीये, त्यांना बळ देण्याची ही वेळ आहे. हे विचार पुन्हा जीवंत करण्यासाठी आणि लोकांना प्रेरित करण्यासाठी आपल्याला संघटनात्मक नेतृत्वाला बदल करावे लागतील. एक गोष्ट स्पष्ट आहे - आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर परिवर्तन करावंच लागेल, असं ट्विट थरूर यांनी केलं.

भाकरी का करपली? पान का खराब झालं? घोडं का अडलं? या तीन प्रश्नांचं उत्तर एकच आहे. फिरवलं नाही म्हणून... काँग्रेसचंही असंच झालंय. स्वातंत्र्यसंग्रामाचा अग्रदूत असलेला पक्ष वाचवायचा असेल, तर भाकरी फिरवणं अपरिहार्य आहे.