Babri Masjid verdict : ...तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल

न्यायालयानं निर्णय सुनावताच काय म्हणाले ओवेसी?

Updated: Sep 30, 2020, 03:30 PM IST
Babri Masjid verdict : ...तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय बुधवारी उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयानं दिला. बाबरी मशिद विध्वंस babri masjid demolition प्रकरणाच्या खटल्यात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सदर घटना पूर्वनियोजीत नव्हती, असं न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी म्हटलं. बाबरी मशिद उद्धस्त केल्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला. 

न्यायालयाच्या याच निकालावर संतप्त प्रतिक्रिया देत एमआयएमचे खासदार asaduddin owaisi अससुद्दीन ओवेसी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. एका पत्रकार परिदषेच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओवेसी यांनी या निकालाचा निषेध केला. 

हा निकाल म्हणजे भारतीय इतिहासातील काळा दिवस, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं ९  नोव्हेंबरला जो निर्णय़ दिला होता, त्यात नियमांचं उल्लंघन करत सार्वजनिक धार्मिक स्थळाची संघटीत प्रयत्नांनी नासधूस करण्यात आली होती असं स्पष्ट म्हणण्यात आल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. शिवाय आता सर्वोच्च न्यायालयच असं म्हणत असताना आज त्याविरोधातील निर्णय येणं ही बाब निराशाजनक असल्याचं स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलं. मशिद काय जादूनं पडली होती का, असा सवाल त्यांनी केला.  

तेव्हा मिठाई वाटली जात होती....

एक भारतीय मुस्लिम म्हणून आज माझा अपमान झाल्यासारखं वाटत आहे. १९९२ मध्येही असंच काहीसं वाटलं होतं, असं म्हणत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं या निर्णयाला आवाहन द्यावं अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणामुळंच भाजप आज सत्तेत आहे, असा गंभीर आरोपही ओवेसी यांनी केला. 

साऱ्या जगानं नाही पाहिलं की बाबरी पडत असताना मिठाई वाटली जात होती. मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती हे मिठाई खात होते. विनय कटियारच्या घरी कट रचला जात होता, रथयात्रा निघाल्या होत्या ही उदाहरणं समोर ठेवत, १९६० पासून आतापर्यंत मुस्लिम धर्मीयांना या प्रकरणात न्याय मिळालेला नाही असा सूर ओवेसींनी आळवला.

 

वही क़ातिल वही मुंसिफ़ अदालत उस की वो शाहिद 

बहुत से फ़ैसलों में अब तरफ़-दारी भी होती है

असं एक सूचक ट्विटही त्यांनी केलं. सोशल मीडियावर बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी सुनावण्यात आलेल्या निर्णयावर ओवेसींनी दिलेली ही प्रतिक्रिया अनेकांचं लक्ष वेधत आहे. राजकीय वर्तुळातही त्याबाबतच्या चर्चा सुरु आहेत.