Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका

Bird flu : जगभरात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने चिंता वाढवली आहे. हा आजा कोविडपेक्षाही जास्त धोकादायक होऊ शकतो असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. भारतात बर्ड फ्ल्यूचा किती धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिीत दिली आहे.

राजीव कासले | Updated: Apr 5, 2024, 10:07 PM IST
Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका title=
संग्रहित फोटो

Bird flu : कोरोनाने (Covid-19) जगभरात थैमान घातलं. या आजाराने अनेकांचा मृत्यू, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. नोकरी-व्यवसाय बंद पडले. या भयानक महामारीतून जग सावरत असतानाच आता नव्या आजाराचं संकट जगासमोर उभं ठाकलं आहे. बर्ड फ्लूवर (Bird Flue) नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. पिट्सबर्गमध्ये बर्ड फ्लूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या आजाराचा मोठा धोका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काळात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. बर्ड फ्लूचा विषाणू H5N1 खूप वेगाने पसरत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. त्यामुळे पक्ष्यांसह आता प्राण्यांनाही संसर्ग होत आहे. जर हा विषाणू असाच वाढत राहिला तर भविष्यात तो कोरोनापेक्षाही भयंकर साथीचं रूप घेऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बर्ड फ्लू आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. पूर्वी हा रोग फक्त कोंबड्यांमध्येच होता. पण आता गायी, मांजर आणि माणसांनाही याची लागण होत आहे. अमेरिकेत कोंबड्यांमध्ये आणि 337000  पिल्लांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. यात कोंबड्यांचा मृत्यूही झालाय. अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे गायींचाही मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत डेअरी फार्ममध्ये काम करणारा एक व्यक्ती H5N1व्हायरसने पॉझिटिव्ह आढलाय. त्यामुळेच वैज्ञानिकांनी यावर संशोधन सुरु केलं आहे. यात बर्ड फ्लूच्या विषाणूमध्ये अनेक प्रकारचं म्यूटेशन होत असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे कोविडपेक्षा बर्ड फ्लूचा धोका अधिक असणार का आणि यामुळे भारतात नवीन साथीचं रुप घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

बर्ज फ्ल्यू म्हणजे काय?
बर्ड फ्लू H5N1 इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होतो. हा विषाणू पक्ष्यांमध्ये पसरतो आणि त्यांच्या श्वसनमार्गावर हल्ला करतो. त्यामुळे पक्ष्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. हा विषाणू पक्ष्यांची विष्ठा आणि लाळेद्वारे पसरतो. याचा संसर्ग दर इतका जास्त आहे की काही दिवसांतच हा विषाणू लाखो पक्ष्यांना संक्रमित करू शकतो.

बर्ड फ्ल्यूचा माणसांना किती धोका?
बर्ड प्ल्यूचा संसर्ग माणसांनाही होऊ शकतो. ज्या व्यक्ती पक्ष्यांच्या सानिध्यात राहतात किंवा पोल्ट्री फार्ममध्ये काम करतात त्यांना या आजाराची लागण होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. पक्ष्यांची विष्ठा आणि संक्रमित पृष्ठभाग यांच्या संपर्कातून बर्ड फ्लू मनुष्यात पसरू शकतो. याचा संसर्ग झाल्यास खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होतो. वेळेवर उपचार न घेतल्यास मृत्यू ओढावू शकतो.

बर्ड फ्ल्यू कोविडपेक्षा धोकादायक?
कोविडपेक्षा बर्ड फ्लू जास्त धोकादायक आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कोविडच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे, पण बर्ड फ्लूमध्ये मानवी संसर्ग कमी आहे. याचा अर्थ असा की हा विषाणू पक्ष्यापासून माणसात पसरला तरी तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरत नाही, तर कोविडचा संसर्ग फार लवकर होतो. एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत बर्ड फ्लू हा कोविडपेक्षा मोठा महामारी बनण्याचा धोका कमी आहे.

बर्ड फ्ल्यूची लक्षण
डोकेदुखी, उल्टी, ताप, श्वास घेण्यास त्रास ही बर्ड फ्ल्यूची लक्षणं आहेत.