उत्तर भारतीय विद्यार्थ्यांमुळे पसरतोय कोरोना; आरोग्यमंत्र्याचं वादग्रस्त विधान

मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 2, 2022, 06:32 AM IST
उत्तर भारतीय विद्यार्थ्यांमुळे पसरतोय कोरोना; आरोग्यमंत्र्याचं वादग्रस्त विधान title=

मुंबई : कोरोनाचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसतोय. असं असलं तरीही देशातील काही शहरांमध्ये प्रकरणं वाढतायत. दरम्यान, तामिळनाडूच्या शैक्षणिक संस्था आणि चेन्नईमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर वक्तव्य करताना राज्याचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यम यांनी यासाठी उत्तर भारतीयांना जबाबदार धरलंय.

ते म्हणाले की, उत्तर भारतातील राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत. आता मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा संदर्भ देत आरोग्यमंत्री म्हणाले की, तामिळनाडूमध्ये 3 महिन्यांपासून दररोज 100 पेक्षा कमी केसेस येतायत. या दरम्यान कोरोनामुळे मृत्यूची एकही घटना नाही. 

चेन्नईजवळच्या एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये कोरोनाची प्रकरणं समोर आल्यावर मंत्री म्हणाले की, यामागील कारण म्हणजे इतर राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 'कॉलेजमध्ये प्रकरणं वाढण्याचं कारण म्हणजे दिल्ली, हरियाणा, यूपी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये दिसून येणारी प्रकरणं. जेव्हा उत्तर भारतातील विद्यार्थी तामिळनाडूच्या कॉलेजमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या माध्यमातून कोरोनाची प्रकरणं वाढतायत." 

कोरोना व्यतिरिक्त, त्यांनी चेन्नईतील विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी उत्तर भारतातील राज्यांनाही जबाबदार धरले आणि ते म्हणाले की, या ठिकाणाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात.