आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का?- सुमीत राघवन

तिन्ही पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते.

Updated: Nov 27, 2019, 06:51 PM IST
आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का?- सुमीत राघवन title=

मुंबई : २४ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभा २०१९ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत मतदारराजानं युतीला प्रचंड मतांनी विजयी केलं. परंतु मुख्यमंत्रीपदामुळे 'भाजप' आणि 'शिवसेना' हे दोन पक्ष सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपा विरूद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. या सत्ता संघर्षात फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते.

एकीकडे परतीच्या पावसाने राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे या पंचतारांकित हॉटेल्स बिल कोण भरेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्ता स्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का, असा उपरोधिक टोला अभिनेता सुमीत राघवनने लगावला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून सुमीतने या विषयावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘ट्रायडंट, रेनेसन्स, ललित, हयात, मॅरिएट या हॉटेल्सनी त्यांच्या मेनूकार्डमधून ‘खिचडी’ हा पदार्थ वगळावा. पण आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार? बहुधा शेतकरी’,असा टोला त्याने लगावला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आणि राज्यातील सत्तापेच सुटला. आता मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.